Friday, November 18, 2011

देऊळ ....( तू झोप मी जागा आहे...)!!

तशी मी नास्तिकच! म्हणजे गणपतीबाप्पा, शंकर, सरस्वती वगैरे आपली दोस्त मंडळी आहेत हे खरे; पण उगीचच त्यांच्या नावे काहीतरी वाट्टेल त्या कथा खपवायच्या, भक्ती आणि आस्तिकतेचा बाजार भरवायचा, आंधळेपणाने, सारासार विवेक न वापरता धर्म, रूढी, प्रथा वगैरे गोष्टीना शरण जायचे हे सपशेल, त्रिवार नामंजूर आहे आपल्याला !! तुम्हीपण आहात का त्यातले? मग ह्या देवळात जरूर जा !
काय म्हणता? तुम्ही आस्तिक आहात, पण तुमची श्रद्धा, तुमचा देव तुमच्यापाशी, असे तुम्हाला वाटते? अरे.. मग तुम्हाला या चित्रपटातील केशव उर्फ केश्या अगदी जवळचा वाटून जाईल.
आणि आपण? आपल्यासाठी देव म्हणजे स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घ्यायचे एक हुकमी साधन आहे का? वा... फार छान...!! हा चित्रपट आपल्यासारख्या संधिसाधू प्रवृत्तींना डोळ्यासमोर ठेवूनच तर बनवला आहे.. म्हणजे पर्यायाने आपणच याचे हिरो झालात की !! तेंव्हा आपली हिरोगिरी पडद्यावर साकारली जात असताना पाहणे हे खूप सुखद असेल आपल्यासाठी.. तेंव्हा आपलेही या देवळात स्वागत !! परत जाताना देवाचा प्रसाद म्हणून थोडे शहाणपणाचे, माणुसकीचे तीर्थ घेऊन गेलात तर अतिउत्तम .. !!
(वरील काही वाक्ये तिरकसपणे लिहिलेली वाटतील कदाचित.. नव्हे ती तशी मुद्दामच लिहिली आहेत..एकंदरीतच चित्रपट पाहत असताना जो अनुभव सतत येत राहतो त्या अवस्थेचा फील तुम्हाला यावा  म्हणून..).
तर हा चित्रपट म्हणजे समाज मनाचा एक आरसा आहे. अतिशय थेट, स्पष्ट, आणि तितकाच प्रामाणिक ! समाजातील विविध प्रवृत्ती, राजकारण्यांची हतबलता आणि समाज सुधारणेच्या बाबतीत असलेली निष्क्रियता, बुद्धीजीवींची तळमळ आणि प्रवाहापुढे झालेला नाईलाज, भोळ्या-निरागस जीवांची दिशाहीनता, समाजातील स्त्रीचे खरे स्थान, अशा अनेक विषयांवर एकाच वेळी मार्मिक, बोचरे भाष्य करणारा असा हा अडीच तासांचा प्रवास, जो उभा केला आहे उमेश कुलकर्णी या संवेदनशील दिग्दर्शकाने !! या प्रवासात त्याचे सोबती कोण आहेत माहित आहे? - नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, आतिशा नाईक, आणि हो - नसिरुद्दीन शाह !! यातील प्रत्येक नावाभोवती असलेले वलय पाहता, काहीतरी वेगळे पाहायला मिळणार याची खात्री सुरुवातीलाच पटते, आणि चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी आपली अवस्था आणखीनच भारून गेल्यासारखी होत जाते. अतिशय संथ गतीत सुरु झालेला हा चित्रपट हळूहळू आपल्या अंगावर येऊ लागतो.. बेचैन करतो.. डोळ्यात अंजन घालतो आणि शेवटला परत एका समेवर येऊन थांबतो.. !!
हा चित्रपट - हि समस्या आणि हे त्याचे उत्तर - अशा निर्णायक भाषेत बोलत नाही. पण समाजात, अगदी आपल्या आजूबाजूला जे घडते त्याचे शंभर टक्के सत्य असे चित्रीकरण करतो. प्रत्येक मनोभूमिकेमागील निरनिराळे कंगोरे, नाण्याच्या एक-दोन नव्हे तर असंख्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक मंगरूळ नावाचे आडगाव. जिथे काही घडतच नाही, आणि काही घडत नाही म्हणून गावातील तरुण पोरांपासून ते एका स्वयंघोषित पत्रकारापर्यंत सगळेच खूप निरुत्साही, कंटाळलेले आहेत. अशा गावात राहणाऱ्या आणि गावातील एका बड्या आसामीच्या घरची गाय राखण करणाऱ्या केशव, उर्फ केश्या या तरुणाच्या स्वप्नात एकदा दत्तगुरु येतात.. अशा वरकरणी सध्या सरळ वाटणाऱ्या घटनेतून सुरुवात होऊन हा चित्रपट कुठल्याकुठे जातो.. आणि ते ही अतिशय गतिमान प्रकारे..!! या गतीमुळे कोणाची चांदी होते, कोण चक्राखाली भरडले जाते, हे सर्व पडद्यावरच पाहणे इष्ट...!!
यातील मार्मिकतेने रेखाटलेल्या प्रसंगांपैकी एकाचे उदाहरणच द्यायचे झाले तर गावातील पुढारी भाऊ (नाना पाटेकर) व गावाविषयी तळमळ असणारे सुधारकी विचारांचे अण्णा (दिलीप प्रभावळकर) यांच्यातील संवादाचे देता येईल. त्यामध्ये अण्णा तळमळीने बोलत असता शेवटी भाऊ त्यांना सांगतात, " अहो अण्णा, अलीकडे कायदा, पलीकडे आम्ही, आणि मध्येच भक्तांची रांग..!! कायद्याला आमच्यापर्यंत येण्यासाठी ही रांग ओलांडावीच लागणार. तेंव्हा तुम्ही काळजी करू नका.. सर्व काही कायदेशीरच होईल !!"  कायदा हातात घेऊन आपल्याला हवा तसा वाकविण्याच्या सत्ताधीशांच्या प्रवृतीचे याहून नेमके वर्णन मला तरी माहित नाही..!!
या चित्रपटाची philosophy म्हणा, हवं तर, ही अण्णांच्या एकाच वाक्यात करता येईल. ते म्हणतात - देव ज्याला मानायचा असेल त्याने मानावा, ज्याला मानायचे नसेल त्याने मानू नये, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.. "
पण हा वैयक्तिक प्रश्नच बघताबघता सार्वजनिक रूप कसे धारण करतो आणि समाजमनाच्या जाणीवा कश्या बंदिस्त करतो हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा...!!!


3 comments:

  1. अजून पाहिला नाही म्हणून ठावूक नाही पण काही जणांना इतकासा आवडला नाही...
    असो चित्रपट आवडला की नाही हा ही प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे...
    परीक्षण चांगले लिहिले आहे...

    ReplyDelete
  2. hello सागर,
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
    चित्रपट एकदा पाहाच, आणि आपले मत जरूर कळवा. :)

    ReplyDelete
  3. बघितला सिनेमा आणि आवडला सुद्धा ...
    छान परीक्षण लिहिले आहे :)

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...