Friday, July 15, 2016

पाऊले चालती...

नमस्कार,

पावसाळा म्हटला की आषाढ-श्रावण हीच जोडगोळी जास्त आठवते. त्यात श्रावणाचे पारडे अनेकविध भावगीतांमुळे जड वाटत असले तरी आषाढाचा एक वेगळा रुबाब आहे. गुरुपौर्णिमा, दिवली अमावस्या, कांदेनवमी आणि "बडा ख्याल" म्हणजे आजची आषाढी एकादशी.

वर्षभर कोणतीही व्रतवैकल्ये नं पाळणारे कितीतरी जणही आषाढी एकादशीचा उपास आवर्जून पाळतात. घराघरात all time hit खिचडी, रताळ्याचा किस, मिठाई, वरीतांदूळ, दाण्यांची आमटी, भोपळ्याचे भरीत, काकढीची कोशिंबीर असे अनेक चविष्ट बेत शिजत असतात. जिकडे ऐकावे तिकडे संतांचे अभंग कानावर पडत असतात.

तिकडे पंढरपुरात तर चंद्रभागेला पूर आलेला असतो.   "मेळा गोपाळांचा" डाव मांडलेला असतो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आणि तो सावळा विठुराया विटेवर उभा राहून हे सर्व न्याहळत असतो. त्याचे दर्शन हे कित्येकांसाठी आयुष्यभराचे समाधान असते.

मी "देव देव" पंथातली किंवा उपास तपास पाळणारी नव्हे हं. पण या वेळी जो अनुभव आला तो आवर्जून शेअर करावासा वाटला. तो अनुभव होता माणसांच्या प्राणशक्तीचा, त्यांच्या झपाटलेपणाचा, त्यांच्या देह धर्म विसरायला लावणाऱ्या भाबड्या श्रद्धेचा.

दिवस २९ जून. पुण्यात वारीचे आगमन होणार होते. माझे ऑफिस येरवड्यात आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे, त्यामुळे आधीच ऑफिस कडून खबरदारीच्या, वारीचा मार्ग वर्णन करणाऱ्या मेल्स आल्या
होत्या. माझ्या टीम मधील जवळपास सर्वजण work from home करत होते. आमचे नवरोजी आणि चिरंजीवही सुखेनैव घरी बसले होते. पण त्या दिवशी का कोण जाणे, मी ऑफिस ला आले. माझ्या टीम मधील एकमेव उपस्थित colleague मला लवकर घरी जायचा सल्ला देत होता.   त्याप्रमाणे माझा कॉल संपवून मी सव्वादोनच्या सुमारास घरी जायला निघाले. रस्त्यावर आल्यावर जाणवले की जवळपास सगळे मार्ग गाड्यांसाठी बंद आहेत. कोणत्याही मार्गावरून गेले की वारकऱ्यांचा जत्था नजरेस पडे आणि माझी गाडी त्याच स्पीडमध्ये जात होती. जणू मी सुद्धा वारीबरोबर चालले आहे. भवति नं भवति करत सव्वाचारच्या सुमारास (बरोबर दोन तासांनी) पुन्हा ऑफिस मध्ये आले. काही खाऊन घेतले आणि साडेचारला पुन्हा प्रयत्न करू म्हणून बाहेर पडले. माणसांची संख्या दहा पट झाली होती. कोणत्याही रस्त्यावरून बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो बंद होत होता. त्यात माझे पुण्यातील रस्त्यांचे ज्ञान अगाध आहे.  थोडा वेळ स्वतःवर आणि वातावरणावर चिडचिडून झाल्यावर शेवटी मानाने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मग नकळतच वैतागाचें रूपांतर कुतूहलात झाले. स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूला बघायला लागले. काय चैतन्य भरले होते वातावरणात... अक्षरशः भारावून गेले. ती अपरिमित एनर्जी गाडीच्या बंद काचांमधूनही येऊन खोलवर भिडत होती. हजारो लोक एक अपरिचित ओढीने डोक्यावर तुळस किंवा विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती घेऊन चालत होते. काहीजण अभंग म्हणत चालले होते. सर्वांचे चेहरे प्रसन्न, तृप्त,.. कसली तक्रार नाही की वखवख नाही. एक माणूस घराच्या अंगणात उभे राहून सर्व वारकऱ्यांना चहाचे आमंत्रण अगदी आग्रहाने देत होता. सर्वजण एकमेकांना नमस्कार करत होते आणि पुन्हा मार्गस्थ होत होते. हजारो गाड्यांमध्ये अडकलेली माझीही एक आणि बाजूने लाखो माणसांचा समुदाय चाललेला. त्या energy चे गारुड इतके होते की क्षणभर "गाडी इथेच ठेऊन या सर्वांबरोबर चालत राहावे" अशी आंतरिक उर्मी दाटून आली. त्याक्षणी मला सच्च्या वारकऱ्यांची तळमळ मनापासून जाणवली व भिडली.

शेवटी साडेनऊला (बरोबर ५ तासांनी) घरी पोचले तेंव्हा घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवऱ्याने डिवचलेही - जाशील आता पुन्हा या दिवशी ऑफिस ला? मी हसून वेळ साजरी केली. कदाचित नाही जाणार... पण या दिवसाचे दान कसे व्यक्त करू शब्दात?? ऑफिस ला जाण्याच्या निर्णयाचा पश्चताप होतोय? - त्रिवार नाही.... !!!
कारण माणसातला विठ्ठल मला दिसला की हो त्या दिवशी .... !!!

सर्वाना आषाढीच्या मनापासून शुभेच्छा....!!!!!
























No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...