Monday, August 8, 2011

Notting Hill.. एक परीकथा !



चित्रपट साधारणतः दोन प्रकारचे असतात. काही अतिशय वास्तवदर्शी असतात तर काही केवळ स्वप्नातच घडू शकतील अशा घटनांचे चित्रण करणारे असतात. मला स्वतःला जसे वास्तवदर्शी चित्रपट पाहायला आवडतात तसेच काही वेळा स्वप्नांच्या राज्यातही रमायला आवडते. का माहित नाही, पण अशा परीकथाही काही वेळा जगण्याची नवीन उमेद देऊन जातात. मन अगदी refresh होते. माझ्या आरामाच्या असंख्य कल्पनेतील खाली दिलेली सर्वात वरच्या क्रमांकाची कल्पना आहे....बाहेर छान पाऊस रिमझिमत असावा, मी माझ्या उबदार घरकुलातील आरामदायी सोफ्यावर निवांतपणे बसून छानश्या जाळीदार खिडकीतून बाहेरचा पाउस व त्यामुळे येणारा गारवा अनुभवत बसावे, एका हातात काहीतरी चटकमटक खायचे व दुसरया हातात चहाचा वाफाळता कप असावा, आणि dvd वर एखाद्या परीकथेत प्रेमाचे गहिरे रंग भारत असावेत... खरच हे चित्र नुसते डोळ्यासमोर आले तरी फार प्रसन्न वाटते. या माझ्या अनुभवाला पूर्णत्व देणाऱ्या ज्या काही परीकथा आहेत त्यामध्ये ' Notting Hill' या चित्रपटाचा क्रमांक खूप वरचा लागतो.

चित्रपट पाहण्याची आणि आवडण्याची कारणे खूप सारी आहेत- बाकी काही आवडत नसले तरी ज्यांना फक्त लंडन हे शहर आवडते त्यांनीही हा चित्रपट जरूर पाहावा. - त्यात मला तर काय, Julia Roberts व Hugh Grant हे दोघेही आवडतात. कोणी म्हणते कि हा चित्रपट Julia Roberts च्या खरया आयुष्यावर आधारित आहे. काही का असेना, आपल्याला मात्र हा चित्रपट एक परीकथा पहिल्याचा आनंद देवून जातो आणि काही क्षणांपुरता का होईना, पण आयुष्य छान आहे, मनात इच्छा असेल तर काहीही घडू शकते, असा विश्वास देतो.

तर William Thacker, हा,(तसा अयशस्वीच म्हणता येईल असा) एक पुस्तकांचे दुकान चालवणारा माणूस! अतिशय अबोल, पण प्रामाणिक आणि सज्जन असा.. (कदाचित म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेलेली असते). तो एका विक्षिप्त (पण मजेशीर) room-mate बरोबर राहत आहे. पण एका बुधवार नंतर त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या दिवशी, लाखात एक अशा योगायोगाने, Anna Scott हि जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या दुकानात पुस्तके घ्यायला येते... त्याच्या साधेपणामुळे प्रभावित होते, नंतर लगेचच एका विचित्र अपघातामुळे ती त्याच्या घरात येऊन पोचते आणि नंतर सुरु होते एक योगायोगांची विलक्षण मालिका..!! आता हि परीकथाच असल्यामुळे शेवट गोड होणार हे ओघाने आलेच, तरीपण julia Roberts व Hugh Grant, यांची पडद्यावरील chemistry अक्षरशः तुफान आहे. त्याला तितकीच मजेशीर साथ आहे ती Rhys Ifans , Tim McInnerny, Gina McKee, Emma Chambers या William च्या धमाल ग्रुपची. अनेक फ्रेम्स मध्ये हि मंडळी स्वतःची छाप सोडतात. काही प्रसंगाची खरी मजा पडद्यावरच घेण्यासारखी... मग तो ' William काही कलाकारांची मुलाखत घेतोय (खोटा पत्रकार बनून) हा प्रसंग असो, किंवा 'Anna William च्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त William बरोबर त्याच्या मित्राकडे जाते हा प्रसंग.. यातील गाणीही अतिशय श्रवणीय आहेत...

एकूण काय, थोडावेळ जर वास्तवाचे भान हरपून स्वप्नांच्या राज्यात रमायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा..

Tuesday, April 12, 2011

एक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... !!

काल सोमवार. आठवड्याचा पहिला आणि बहुतकरून सर्वांना थोडासा नकोसाच वाटणारा दिवस.. पण माझ्यासाठी मात्र खूप खूप चांगला उगवला होता बऱ का ! 
त्याचे झाले काय, की गेल्या वीकेंड ला माझा लाडका, एकुलता एक धाकटा भाऊ माझ्याकडे राहायला आला होता. शनिवार-रविवार मध्ये मी, माझा नवरा, माझा दोन वर्षाचा छकुला व त्याचा मामा अशी चार जणांनी मिळून धमाल केल्यावर सोमवारी मात्र मला माझे लहानपण पुन्हा -एक दिवसासाठी का होईना - अनुभवावेसे वाटले , म्हणून मग नवरा कामावर गेल्यावर आणि अरिन ला day-care मध्ये सोडल्यावर  (ऑफिसला रीतसर सुट्टी टाकून)  मी आणि माझे बंधुराज जे बाहेर पडलो ते गावभर भटकंती करून व झक्कास जेवण करून थेट दुपारीच घरी उगवलो. त्यानंतर , घरातील टेरेस मध्ये तासभर गप्पांचा फड जमवला. काल सुदैवाने हवासुद्धा कुंद, पावसाळी -पण मला अतिशय आवडणारी- अशी होती. मग एकदम माझ्या डोक्यात आले, की अरे, आपल्याला लाडक्या नवरोजीनी गेल्या वाढदिवसाला जो champion board गिफ्ट दिला आहे तो तसाच धूळ खात पडून आहे. मग काय, पुढचा तासभर मस्तपैकी कॅरम खेळून जीव रमवला. सोबतीला अखंड गप्पांचा रतीब चालूच होता. त्यावेळी जाणवले की खरच कितीतरी दिवसांनी आपण असे मोकळेपणानी हसतोय, बडबडतोय... मधली वर्षे जणूकाही गायबच झाली होती आमच्या दोघांसाठी! माझ्या  डोळ्यासमोर  ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर...! माझ्या भावाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. कालच्या एका दिवसाने मला किमान पाच वर्षांनी तरुण केले... !!

माझा हा कालचा अनुभव हा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी , रुटीन मधून बाहेर पडून, एक दिवस तरी निवांत, मनाजोगता घालवण्याची नितांत गरज असते. असं म्हणतात की असा एक दिवस जरी आपण जगलो तरी आयुष्य जवळपास पाच वर्षांनी वाढते. 

नेमकी हीच थीम आहे मी आज ज्याविषयी लिहिणार आहे त्या चित्रपटाची! नाव आहे अर्थातच - एक उनाड दिवस !
विश्वास दाभोळकर एक अतिशय शिस्तप्रिय माणूस. नियमाप्रमाणे अथवा शिस्तीने न वागणारी माणसे त्यांना सहनच होत नाहीत. पण या माणसावर जेंव्हा त्याच्या वाढदिवशीच काही कारणामुळे एक संपूर्ण दिवस बाहेर -रस्त्यावर - व्यतीत करण्याची वेळ येते, तेंव्हा काय होते याचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. सामान्य माणसे, त्यांचे छोटे छोटे आनंद व त्यातूनच त्यांच्या चेहेरयांवर फुललेले निर्व्याज हसू हे सगळे आपल्याही कुठेतरी आत आत भिडते.. पटते.  तसे पाहिले तर अशा क्षणातच आपले आयुष्य सामावले असते की ! म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय? खर की नाही?
अशोक सराफ हे विश्वास दाभोळकर म्हणून अगदी झकास. बाकी सर्वांच्याच अगदी छोट्या भूमिका आहेत. खास उल्लेख करायलाच हवा तो फैयाज यांच्यावर चित्रित केलेल्या 'हुरहूर असते तीच उरी ' या शोभा जोशी यांनी गायलेल्या गजलेचा... ती गजल, ते शब्द, ती चाल सारे काही  एकदम ' hi class' !!

शेवटी एक सांगावेसे वाटते की शांतपणे बसून हा चित्रपट पाहिलात तरी तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटेल...लावता पैज? 

Friday, April 8, 2011

कुंकू .. (सन १९३७)

वाचकहो, 
लेखाचे शीर्षक वाचून तुमच्या चेहरयावर उमटलेले प्रश्नचिन्ह मला स्पष्टपणे दिसते आहे. ' Out of Africa ' नंतर लगेच कुंकू? आणि ते सुद्धा आपल्या आजोबांच्या काळातील? पण माझी खात्री आहे, जर तुमच्यापैकी कोणी हा सिनेमा पहिला असेल तर तुम्हाला या दोघांमधील समान धागा लगेचच उलगडेल. या दोघांचेही एक ठळक वैशिष्टय असे कि हे दोन्ही चित्रपट खरया अर्थाने स्त्री-केंद्रित आहेत. मग भले समस्या निराळ्या का असेनात..!!
      एका वाक्यात सांगायचे तर हा सिनेमा म्हणजे एक नामवंत वकील 'काकासाहेब' आणि त्यांची (मुलगी शोभेल अशी) पत्नी 'नीरा' यांच्यातील खिळवून ठेवणारा संघर्ष आहे. 

नीरेवरील मातापित्यांचे छत्र केंव्हाच हरपले आहे. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण दिले आहे. सुसंस्कृत केले आहे, तसेच स्वतंत्रपणे विचार करायलाही शिकवले आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न नीरा, आपल्या मामा-मामीच्या घरात राहत आहे. त्या घरातील परिस्थिती तिच्या घराच्या अगदी विरुद्ध आहे. मामा मामी घरच्या गरिबीला आणि खंडीभर मुलांना कंटाळलेले आहेत. परिस्थितीवश मामा नीरेचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बरयाच मोठया अशा एका नामवंत वकिलाशी लावून देतो. हे लग्न नीरेला फसवून करण्यात आले आहे. म्हणजे बैठकीला एका तरुण मुलाला बसवून प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी मात्र या बिजवराला उभे करण्यात आले आहे. नीरेला जेंव्हा सत्य परिस्थिती उमगते तेंव्हा सर्वप्रथम ती हे लग्नच नाकारते. पण घरातील कोणीही तिचे काहीएक न ऐकता तिला नवरयाबरोबर त्याच्या गावी रवाना करतात. नीरा त्या गावाला जाते खरी, पण तिथे त्या घरातच ती स्वताचे वेगळे विश्व निर्माण करते. वृद्ध पतीचा मान राखतानाच त्याला शरण जायचे नाकारते. नवर्याच्या कारस्थानी आत्याविरुद्ध बंड पुकारतानाच, तिच्या नातीबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करते. घरातील अडगळीच्या खोलीचे स्वरूप पालटते. त्या खोलीला देवघरचे रूप आणते. काकासाहेबांच्या उद्धट आणि रंगेल मुलाला वठणीवर आणतानाच त्यांच्या बुद्धिमान मुलीचा आदर्श मात्र सतत डोळ्यासमोर ठेवते. शेवटी काय होते ते पडद्यावरच पाहणे योग्य..
चित्रपट, मग तो कोणत्याही काळातील असे ना का, त्याची कथा हाच त्याचा खरा आत्मा असतो, हे हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला नव्याने जाणवते. तसे पाहिले तर हा चित्रपट 'कृष्णधवल' काळातील आहे. तरीपण दमदार कथेच्या आणि सच्या सादरीकरणाच्या शोधात असलेल्या कुणाही रसिकाला रंगांची कमतरता मुळीच जाणवू नये अशीच या चित्रपटाची मांडणी आहे. 
शांता आपटे (नीरा) आणि केशवराव दाते (काकासाहेब) या नामवंत कलाकार मंडळीनी आपापल्या भूमिकांमध्ये आपला जीव ओतला आहे.  त्यातील आशयघन गाणी, प्रभात ची दर्जेदार निर्मितीमूल्ये.. सारेच विचार करायला लावणारे.. आपणा सर्वांसाठी हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देवून जातो - 

' मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वीमोलाची !
तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची, परवा ही कुणाची ?' 


Tuesday, April 5, 2011

'Out of Africa'--- नव्हे 'out of the world ' ......

वाचकहो, 
पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी पाहिलेल्या , आणि अर्थातच मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहिण्याचा मानस आहे. हेतू हा, कि त्या निमित्ताने आपल्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करता येईल व त्याहूनही महत्वाचे म्हणजे, मला तो चित्रपट पुन्हा नव्याने अनुभवता येईल. तर आजचे या मालिकेतले पहिले पुष्प.. अर्थात , ' OUT OF AFRICA....!!

 दिग्दर्शक Sydney Pollack च्या १९८५ साली पडद्यावर आलेल्या या अद्वितीय कलाकृतीला सात वेगवेगळ्या विभागांमध्ये 'academy awards ' ने गौरवण्यात आले होते. मला वाटते कि इतकी माहितीसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करण्यास पुरेशी आहे. तरीपण ..
तर हा चित्रपट Isak Dinesen (टोपणनाव Karen Blixen) या लेखिकेच्या 'out of Africa' या १९३७ साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रावर बेतलेला आहे. आणि तो घडतो साधारण १९१४ ते १९३१ या कालखंडात.
चित्रपट सुरु होतो तो डेन्मार्क मध्ये... वृद्ध कारेन अंथरुणावर खिळली आहे. तरीही तिच्या डोळ्यासमोर तरळत आहे तिने आफ्रिकेत मोंबासा येथे Ngong Hills च्या पायथ्याशी विकत घेतलेले फार्म हाउस ! आफ्रिकेतील वास्तव्याशी निगडीत आहे तो तिच्या आयुष्यातील रुढार्थाने सर्वात अपयशी , पण तरीही तिच्यादृष्टीने सर्वात रोमांचकारी कालखंड ! कारण त्याला Denys Finch Hatton या मुक्तात्म्याच्या प्रेमाची गहिरी झालर लाभली आहे !!
कारेन गोष्ट सांगायला सुरुवात करते.."I had a farm in Africa......" आणि मग सुरु होतो जवळपास अडीच तासांचा प्रवास... कधीही संपू नये असे वाटणारा... 
कारेन ही एक श्रीमंत, उच्चकुलीन अशी डेन्मार्क येथे राहणारी स्त्री. केवळ baroness हे बिरूद लावण्यासाठी ती   bror Blixen नावाच्या एका baron शी लग्न ठरवते. तिचे स्वप्न असते.. आफ्रिकेमधील तिच्या टुमदार फार्म हाउसवर एक डेअरी सुरु करण्याचे. पण लग्न करण्यासाठी जेंव्हा ती आफ्रिकेत पोचते, तेंव्हा तिच्या लक्षात येते कि तिच्या सुनियोजित वराने त्या जागेचा वापर कॉफीची लागवड करण्याकरता करायचे ठरविले आहे; नव्हे तशी तयारीही सुरु केली आहे ! संघर्षाची पहिली ठिणगी इथेच पडते.  लग्नाच्या दुसरयाच दिवशी कारेनला एकटीला टाकून तिचा नवरा दूर शिकारीला निघून जातो.. तिला मनस्वी यातना होतात. पण ती आहे त्या परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज होते. कॉफी लागवडीच्या कामात जातीने लक्ष घालते. तिथल्या स्थानिक कामगारांची मने आपल्या वागणुकीने जिंकते. त्यांच्यासाठी पुरेसा रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करते. त्या कुकुयू जमातीच्या आदिवासींच्या मुलांनी शाळेत यावे म्हणून जंग-जंग पछाडते. या सगळ्यामध्ये तिला आधार मिळतो तो Denys Finch Hatton या उमद्या व्यक्तिमत्वाचा.. तो तिला एक स्त्री म्हणून न वागवता एक माणूस, एक व्यक्ती म्हणून सन्मानाने वागवतो. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. तिला खऱ्या अर्थाने मुक्तपणे जगायला शिकवतो. कारेन त्याच्यामध्ये पूर्ण गुंतत जाते.. पण सरतेशेवटी तिचे दुर्दैव तिच्या इच्छाशक्तीवर मात करते.. 

आता चित्रपटाची पूर्ण स्टोरी सांगायची म्हटली तर एवढीच... पण त्यातील अतिशय तलम कशिदाकारी हि फक्त पडद्यावरच पाहण्यासारखी... खरे तर हा चित्रपट नुसता पाहण्याचा नाहीच. तर ती पंचेद्रीयानी अनुभवण्याची गोष्ट आहे.. चित्रपटातील सिंहांची शिकार, हत्तींचे चित्कार, रातकिड्यांची किरकिर, कानांना तृप्त करणारी मोझार्ट ची symphony, तो आफ्रिकेतील वेळीअवेळी कोसळणारा पाउस, हे सगळे शब्दात पकडणे केवळ अशक्य.. 
चित्रपटातील कालखंड साधारण पहिल्या महायुद्धाच्या आसपासचा. त्यामुळे, त्याकाळी स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक पाहता, कारेनचा संघर्ष आणखीनच उठून दिसतो. 
चित्रपटाच्या अनेक plus points पैकी प्रामुख्याने काही सांगायचे म्हटले तर त्यातील कलाकारांची फौज! Meryl Streep ही गुणी अभिनेत्री 'कारेन ' अक्षरशा जगली आहे. तीच गोष्ट Robert Redford याची. या दोन दिग्गजान्विषयी मी काही लिहावे इतकी माझी पात्रता नाही... दुसरे म्हणजे या चित्रपटाची cinematography.. 
ती फक्त अनुभवायची! जगायची !!
काय, आता इतके सांगितल्यावर वाटतोय न हा चित्रपट पाहण्यासारखा? मी तरी लिहिता लिहिताच पुन्हा एकदा तो जगले... विश्वास ठेवा, चित्रपट पाहिल्यावर खूप वेळ रेंगाळत राहील तो मनात...!!!

टीप - वरील व्यक्त केलेली मते हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत.. त्याची कृपया चित्रपटाच्या समीक्षेशी गल्लत करू नये ही विनंती. 

Monday, April 4, 2011

सृजनाची ही असे घडी, चला उभारू उंच गुढी...!!





तो फुलांनी गच्च बहरलेला गुलमोहोर, ती कोकीळा, तो अशोकवृक्ष, ती आंबा व कडुनिंबाची कोवळी पालवी, तो मोगऱ्याचा गंध काय बरे सांगत आहेत? ती सकाळची प्रफुल्लीत सूर्यकिरणे कोणाचे स्वागत करीत आहेत ? 
कालपर्यंत सोबतीला असलेली मनावरची मरगळ अचानक कुणी निपटून काढली आहे? ही त्या चैत्राची किमया तर नव्हे? मग प्रवीण दवणे म्हणतात तशी खरच ही 'चैत्रपालवी' नव्हे तर ' मैत्रापालवी' आहे... शांताबाई शेळके यांनी या रुतूराजाचे स्वागत किती समर्पकपणे केले आहे..
गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला.. !!

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
नूतन वर्षाभिनंदन.....!!!



Monday, February 21, 2011

गंध !.. उदबत्तिचा, औषधांचा आणि तान्हुल्या जीवाचाही...!!!

नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की, स्वारीने कालच हा सिनेमा पाहिलेला दिसतोय. 
तर गंध.. काय बरं फरक आहे वास आणि गंध यात? मला वाटते की वासाला आठवणी चिकटल्या की तो गंध होतो. 
ह्या पिक्चरचेच पाहा ना, तीन निरनिराळी  कथानके, पात्रांचे जगण्याचे मापदंडही वेगळे, तरीही या सर्वांना जोडणारा एक common धागा..अर्थात गंध !
पहिली गोष्ट एका उपवर लग्नेच्छु तरुणीची. घरचे 'लग्न कर' म्हणून मागे लागलेले , स्थळही सांगून येतायत आणि अशातच तिला भेटतो एक साधासा तरुण  ज्याच्या शरीरगंधावर ती मोहित होते. पुढे त्याचा पाठलाग करत असताना तिला कळते की तो रात्री एका उदबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात काम करत असतो. नंतर काय होते हे सुज्ञास  सांगणे न लगे... पण तरीही.. या कथेचा सुखांत होतो!!  खरेतर ही कथा फार वेगळी नाही. काही वेळा तर  अमृता सुभाषच्या थोड्याश्या नाटकी अभिनयाचा वैतागही येतो. तरीपण कथेची मांडणी, camera ने पकडलेल्या ओळखीच्या तरीही वेगळ्या अशा पुण्यातल्या गल्ल्या आणि गिरीश कुलकर्णीचा संयत अभिनय या गोष्टी आपल्याला नक्कीच खिळवून ठेवतात. 
          माझ्यामते तरी हा सिनेमा  उरलेल्या दोन कथांमध्ये जबरदस्त पकड घेतो. एक गोष्ट म्हणजे 'औषध घेणारा माणूस' आणि दुसरी ' बाजूला बसलेली बाई'. त्यापैकी 'औषध घेणारा माणूस' ही गोष्ट आहे एका 'HIV positive ' माणसाची ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे व काही काळाने त्याला परत भेटायला आली आहे. त्या दोघानमधिल अजूनही शिल्लक असलेल्या प्रेमाचे रंग सोनाली कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी अतिशय हळुवारपणे साकारले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही पण मिलिंद सोमण हा ही किती गुणी कलाकार आहे हे वेळोवेळी  जाणवते. खास उल्लेख करायला हवा तो त्याच्या शुद्ध मराठी उच्चारांचा.. [ हो कारण बरीचशी मराठी models , मराठी अगदी नवीन शिकत असल्यासारखे बोलतात.] 
                   हा 'HIV positive ' माणूस फक्त औषधांवर जगतोय, पण त्याची पत्नी त्याला ज्यावेळी सोडून गेली त्या क्षणापासून त्याने ते घर जसे च्या तसे ठेवले आहे.. तिची आठवण म्हणून! ती खूप दिवसांनी घरी येणार ह्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने मनात अगणित योजना तयार केल्या आहेत. खास तिच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला आहे. पण तिला मात्र आल्यापासून कसला तरी सडलेला दर्प येतो आहे घरात आणि मग हळूहळू त्या दोघांना (आणि आपल्यालाही) असे जाणवते की हा माणूस वास घ्यायची शक्तीच गमावून बसलाय. अगदी कांदा किंवा लिंबू अशासारखे तीव्र वासही त्याला जाणवत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून तो gas चे  बटण  लावतो व बर्नर च्या अगदी जवळ जाऊन तो वास घ्यायचा प्रयत्न करतो... कितीतरी वेळ... याचा शेवट दिग्दर्शकाने जसा काही तुमच्यावर सोडला आहे...अगदी कालवाकालव होते त्यावेळी... 
         तिसरी गोष्ट आहे तळकोकणातल्या अशा एका घराची ज्यामध्ये एक माहेरवाशीण बाळंत होत आहे आणि त्या घरातील कर्ती बाई 'बाजूला' बसली आहे. तिचा नवरा बाहेरगावी गेला आहे. या सगळ्या वातावरणाला पार्श्वभूमी आहे ती मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेची. एकीकडे या बाईची सासू मुलीचे बाळंतपण पार पाडताना मेटाकुटीला आली आहे तर दुसरीकडे या 'बाजूला' बसलेल्या बाईचीही तगमग होत आहे... दोन कारणांमुळे, एक म्हणजे घरातील घडामोडी व दुसरे म्हणजे तिची स्वतःची कूस अजून रिकामीच आहे.. या सर्व काळामध्ये तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा भाचा राघव! या दोघांमधील संवाद, त्याच्यामधील राघूचा निरागसपणा, नीना कुलकर्णीच्या डोळ्यामधील भाव [हो, सांगायचे राहिलेच, ही बाजूला बसलेली बाई  नीना कुलकर्णीने रंगवली आहे .]  यातील काहीही miss करून चालणार नाही. शेवटी चौथा दिवस उजाडल्यानंतर कसेबसे सर्व आवरून ही बाई जेव्हा त्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्या जावळाचा, त्याच्या अंगाचा श्वास भरून गंध घेते तेव्हाची तिची भावमुद्रा आपल्या मनात कायमचे घर करते. 
      ही गोष्ट घडत असताना दिग्दर्शकाने (किंवा कैमेरामन ने म्हणूया हवे तर) तळकोकणाचे असे काही भुलवणारे रूप दाखवले आहे की निव्वळ त्याच्यासाठी ह्या सिनेमाला १०० पैकी २०० मार्क्स द्यावेत. एडिटिंग ची सुद्धा हीच गोष्ट आहे... 
एकूण काय, सचिन कुंडलकर यानी त्यांच्या ठेवणीतून पेश केलेल्या या अत्तराच्या कुपीचा गंध आपल्या मनात दीर्घकाळ रुंजी घालतो हे नक्की...!!

          

Monday, February 14, 2011

Happy Valentines Day.. To all human beings!!


प्रेम..नुसत्या उच्चारानिशी अंगावर रोमांच फुलवणारा जादुई शब्द ! 
व्यक्ती बदलली की प्रेमाचे संदर्भही बदलतात. कोणासाठी मातृप्रेम  हे सर्वश्रेष्ठ तर कोणासाठी देशप्रेम . कोणाला सत्तेचे प्रेम आंधळे  बनवते तर कोणाला पैशाचे प्रेम... कोणी दर दिवसाला बदलणारी गर्लफ्रेंड हीच प्रेमाचीअभिव्यक्ती मानतो तर दुसरीकडे 'जिच्यावर मनापासून प्रेम केले अश्या प्रेमिकेचा दुर्दैवी अंत झाल्यावर तिच्या आठवणीवर  उरलेले आयुष्य काढणारा प्रेमिकही आपल्याला भेटतो. पण एक मात्र नक्की, आपण सगळे  'प्रेम' या संकल्पनेवरच  मनापासून प्रेम करत असतो.
त्यातून आज तर काय, जगभरातील 'प्रियकर-प्रेयसीला' त्यांच्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करायचे license  देणारा दिवस.. जिकडे पाहावे तिकडे कसे गुलाबी वातावरण तयार झाले आहे. सगळ्या सार्वजनिक बागा आणि जागा  तरुणाईने  भरून आणि बहरून गेल्या आहेत. ' I LOVE YOU'  किंवा 'मी तुझी साथ जन्मभर सोडणार नाही' अशा आणाभाका चोहिकडे ऐकू येत आहेत. (त्यातल्या किती निभावल्या जातात त्याचे संशोधन करायला वेळ कुणाला आहे इकडे? ).  बरयाच विवाहोत्सुक जोड्यांनी लग्नबंधनात अडकण्यासाठी आजचाच पवित्र(?) मुहूर्त निवडलाय. dinner ला कोठे जायचे, आपल्या प्रिय व्यक्तीला भेट काय द्यायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले आहे. एखाद्याच्या मनात जर गिफ्ट विषयी confusion असेलच चुकून, तर मोठमोठे shops आहेत की सज्ज तुमची ही छोटीशी समस्या दूर करायला.. हा खिसा तेवढा जड़ असला की झाले..  
वरील सर्व वाचून 'हिला प्रेमाची allergy आहे का ' असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू का, मला allergy ही प्रेमाविषयी नसून प्रेम साजरे करण्याच्या प्रकाराबद्दल आहे. इतक्या हळुवार, नाजूक भावनेचे जाहीर प्रदर्शन करण्याची खरोखरीच किती गरज आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत ही भावना पोचली की पुरेसे नाही का? आणि गिफ्ट चे म्हणाल तर तुमचे शाश्वत प्रेम हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे गिफ्ट नाही का? म्हणजे काहीच गिफ्ट देऊ नका असे नाही.. पण केवळ  त्याच्या  किमतीवरून तुमच्या प्रेमाची खोली नाही ना मोजली जाऊ शकत...तेव्हा गिफ्ट देताना त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार सर्वात आधी..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'partner' खेरीज इतरही माणसे आहेत हो आपल्या जीवाभावाचीज्यांनी स्वतःच्या असंख्य इच्छा-आकांक्षा बाजूला सारून तुम्हाला परिस्थितीची जाणीव न करू देता वाढवले ते आई-बाबा,ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःला मिळालेल्या chocolate चा अर्धा तुकडा राखून ठेवला ती तुमची भावंडे, ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात साथ दिली ते तुमचे शेजारी, तुम्हाला शिकवलेले शिक्षक.. फार गरज आहे हो यासगळ्यांना तुमच्या प्रेमाची.... तुम्ही ते करत नसाल असे नाही, पण त्याची कबुली त्या व्यक्तीकडे देऊन तर बघा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खूप काही देऊन जातील तुम्हाला.. आपले आयुष्य ज्यांनी ज्यांनी सुंदर केले त्यांनाआपण बाकी काही देऊ शकत नसलो तरी त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, कृतदन्यता व्यक्त करण्यासाठी या दिवसासारखा दुसरा दिवस नाही असे मला तरी वाटते. 
तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून 'Happy Valentines Day....!!!'

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...