Thursday, July 21, 2016

Zootopia... Anyone can be Anything !!!

नमस्कार,

गेली दोन तीन वर्षे आमच्या कुटुंबाचा (मी, पतिदेव, व चिरंजीव ) एक रिवाज ठरून गेलाय जसा काही. वीकेंड्स ना जर दूरवर फिरायला जायचे नसले तर सरळ एखादा 'पिक्चर टाकायचा'. म्हणजे अतिरेकी चिकित्सा नं करता मनाचा कौल घेऊन निघायचे. शक्यतो पाटी कोरी ठेऊन. आणि गंमत म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलाच अनुभव येतो. त्यात पुत्ररत्न जसजसे मोठे होत आहे तसतसे त्याचे मत हे 'भरतवाक्य' होत आहे. पर्यायाने गेल्या काही वर्षातले जवळपास सर्व ऍनिमेशन चित्रपट बघून झाले आहेत. त्यातले एक-दोन तर फ्रेम- टू-फ्रेम पाठ झाले आहेत. पण खरं सांगू का? सुरुवातीला 'काय ते लहान मुलांचे चित्रपट बघायचे? ' अशी कुरकुर करणारे आम्ही आता 'मोठ्या माणसांच्या बऱ्याच वेळेला अर्थहीन (आणि बिनडोक)चित्रपटांपेक्षा लहान मुलांचे निर्व्याज आनंदी चित्रपट खूप चांगले' अशा मताचे झालो आहोत. त्यात ते 3D असले तर दुधात साखर. :)

या मांदियाळीतला मला सर्वांत आवडलेला चित्रपट - Zootopia .. .!!  Rotten Tomatoes वर 90 % पेक्षा जास्त positive reviews मिळालेला, आणि जाणकारांच्या मते Disney चा २० वर्षांतील सर्वात सुंदर चित्रपट. अर्थात हे नंबर्स मला चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवताना कळले बरं का ! चित्रपट बघायला जाताना नेहेमीप्रमाणेच पूर्णपणे अज्ञातात उडी घेतली होती. आणि काय सांगू महाराज, पहिल्या फ्रेम पासूनच चित्रपटाने मनाचा असा ठाव घेतला की ज्याचे नाव ते. लहानांना आवडणारे आणि मोठ्यांसाठीही अतिशय प्रेरणादायी ठरतील अशा चित्रपटांमध्ये झूटोपियाचे नाव नक्की घेतले जाईल यात शंका नाही.

एक आटपाट नगर - झूटोपिया. तिथे सगळे प्राणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्या नगरातलाच एक गुणी ससा (की मिस. ससा : ) ) तिचे स्वप्न आहे पोलीस ऑफिसर व्हायचे. त्याप्रमाणे अपार कष्ट करून ती आपले ध्येय साध्य करते. मग तिची नेमणूक शहराच्या मध्यभागी असलेल्या सिटी सेंटर या भागात होते. त्या शहराचा पोलीस मुख्यायुक्त चीफ बोगो याच्यासमोर १४ बेपत्ता झालेल्या प्राण्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्राणी भक्षक वर्गातले आहेत. भवती नं भवति करत ह्या केसची थोडीशी जबाबदारी ज्युडी कडे (ससा) येऊन पडते. या केसवर काम करताना तिला प्राण्यांचे जे असंख्य मुखवटे आणि मुखवट्यामागील चेहरे दिसतात त्या सगळ्याची गोष्ट म्हणजे हा नितांतसुंदर चित्रपट. थिएटर मध्ये दोन वेळा बघूनही समाधान नं झाल्यामुळे त्याची डीव्हीडी विकत घेऊन टाकली आहे आणि तीसुद्धा तीन चार वेळा बघून झाली आहे.
या चित्रपटातली सर्वच पात्रे - Nick Wilde, Judy Hopps, Chief Bogo, Clawhauser, Mr. Big, Finnick, Flash, Gazelle - अगदी प्रेमात पडावे अशी आहेत. प्रत्येकाचं असं एक वैशिष्टय आहे.  ते इथे सांगून चित्रपटातली मजा घालवायची नाही मला अर्थात. या चित्रपटाचे Animation आणि Voice over चा मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या चित्रपटाचे सार शकीराने गायलेल्या गाण्यात आहे - 

I messed up tonight
I lost another fight
I still mess up but I'll just start again
I keep falling down
I keep on hitting the ground
I always get up now to see what's next
Birds don't just fly
They fall down and get up
Nobody learns without getting it wrong

I won’t give up, no I won’t give in
Till I reach the end
And then I’ll start again
Though I’m on the lead
I wanna try everything
I wanna try even though I could fail

नक्की बघा हा चित्रपट. आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास अंगी रुजवण्यासाठी.... !!!!






Friday, July 15, 2016

पाऊले चालती...

नमस्कार,

पावसाळा म्हटला की आषाढ-श्रावण हीच जोडगोळी जास्त आठवते. त्यात श्रावणाचे पारडे अनेकविध भावगीतांमुळे जड वाटत असले तरी आषाढाचा एक वेगळा रुबाब आहे. गुरुपौर्णिमा, दिवली अमावस्या, कांदेनवमी आणि "बडा ख्याल" म्हणजे आजची आषाढी एकादशी.

वर्षभर कोणतीही व्रतवैकल्ये नं पाळणारे कितीतरी जणही आषाढी एकादशीचा उपास आवर्जून पाळतात. घराघरात all time hit खिचडी, रताळ्याचा किस, मिठाई, वरीतांदूळ, दाण्यांची आमटी, भोपळ्याचे भरीत, काकढीची कोशिंबीर असे अनेक चविष्ट बेत शिजत असतात. जिकडे ऐकावे तिकडे संतांचे अभंग कानावर पडत असतात.

तिकडे पंढरपुरात तर चंद्रभागेला पूर आलेला असतो.   "मेळा गोपाळांचा" डाव मांडलेला असतो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आणि तो सावळा विठुराया विटेवर उभा राहून हे सर्व न्याहळत असतो. त्याचे दर्शन हे कित्येकांसाठी आयुष्यभराचे समाधान असते.

मी "देव देव" पंथातली किंवा उपास तपास पाळणारी नव्हे हं. पण या वेळी जो अनुभव आला तो आवर्जून शेअर करावासा वाटला. तो अनुभव होता माणसांच्या प्राणशक्तीचा, त्यांच्या झपाटलेपणाचा, त्यांच्या देह धर्म विसरायला लावणाऱ्या भाबड्या श्रद्धेचा.

दिवस २९ जून. पुण्यात वारीचे आगमन होणार होते. माझे ऑफिस येरवड्यात आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे, त्यामुळे आधीच ऑफिस कडून खबरदारीच्या, वारीचा मार्ग वर्णन करणाऱ्या मेल्स आल्या
होत्या. माझ्या टीम मधील जवळपास सर्वजण work from home करत होते. आमचे नवरोजी आणि चिरंजीवही सुखेनैव घरी बसले होते. पण त्या दिवशी का कोण जाणे, मी ऑफिस ला आले. माझ्या टीम मधील एकमेव उपस्थित colleague मला लवकर घरी जायचा सल्ला देत होता.   त्याप्रमाणे माझा कॉल संपवून मी सव्वादोनच्या सुमारास घरी जायला निघाले. रस्त्यावर आल्यावर जाणवले की जवळपास सगळे मार्ग गाड्यांसाठी बंद आहेत. कोणत्याही मार्गावरून गेले की वारकऱ्यांचा जत्था नजरेस पडे आणि माझी गाडी त्याच स्पीडमध्ये जात होती. जणू मी सुद्धा वारीबरोबर चालले आहे. भवति नं भवति करत सव्वाचारच्या सुमारास (बरोबर दोन तासांनी) पुन्हा ऑफिस मध्ये आले. काही खाऊन घेतले आणि साडेचारला पुन्हा प्रयत्न करू म्हणून बाहेर पडले. माणसांची संख्या दहा पट झाली होती. कोणत्याही रस्त्यावरून बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो बंद होत होता. त्यात माझे पुण्यातील रस्त्यांचे ज्ञान अगाध आहे.  थोडा वेळ स्वतःवर आणि वातावरणावर चिडचिडून झाल्यावर शेवटी मानाने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मग नकळतच वैतागाचें रूपांतर कुतूहलात झाले. स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूला बघायला लागले. काय चैतन्य भरले होते वातावरणात... अक्षरशः भारावून गेले. ती अपरिमित एनर्जी गाडीच्या बंद काचांमधूनही येऊन खोलवर भिडत होती. हजारो लोक एक अपरिचित ओढीने डोक्यावर तुळस किंवा विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती घेऊन चालत होते. काहीजण अभंग म्हणत चालले होते. सर्वांचे चेहरे प्रसन्न, तृप्त,.. कसली तक्रार नाही की वखवख नाही. एक माणूस घराच्या अंगणात उभे राहून सर्व वारकऱ्यांना चहाचे आमंत्रण अगदी आग्रहाने देत होता. सर्वजण एकमेकांना नमस्कार करत होते आणि पुन्हा मार्गस्थ होत होते. हजारो गाड्यांमध्ये अडकलेली माझीही एक आणि बाजूने लाखो माणसांचा समुदाय चाललेला. त्या energy चे गारुड इतके होते की क्षणभर "गाडी इथेच ठेऊन या सर्वांबरोबर चालत राहावे" अशी आंतरिक उर्मी दाटून आली. त्याक्षणी मला सच्च्या वारकऱ्यांची तळमळ मनापासून जाणवली व भिडली.

शेवटी साडेनऊला (बरोबर ५ तासांनी) घरी पोचले तेंव्हा घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवऱ्याने डिवचलेही - जाशील आता पुन्हा या दिवशी ऑफिस ला? मी हसून वेळ साजरी केली. कदाचित नाही जाणार... पण या दिवसाचे दान कसे व्यक्त करू शब्दात?? ऑफिस ला जाण्याच्या निर्णयाचा पश्चताप होतोय? - त्रिवार नाही.... !!!
कारण माणसातला विठ्ठल मला दिसला की हो त्या दिवशी .... !!!

सर्वाना आषाढीच्या मनापासून शुभेच्छा....!!!!!
























Wednesday, July 13, 2016

किल्ला.. आठवणींचा आणि अनुभवांचा....

नमस्कार,

सध्या सगळीकडे अगदी नभ उतरू आलं आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस आणि मन चिंब करणाऱ्या आठवणी - कसं अलवार आणि अतूट नातं. शाळेत असताना हिरव्यागार गवतात फुलपाखरांशी केलेली दंगामस्ती, भिजून कुडकुडत घरी येणे आणि नेमके लाईट नसणे. मग काळोखातच आईच्या हातचे गरमागरम जेवण, तिचा प्रेमळ स्पर्श. मग माळ्यावर बसून कानात साठवलेला तो पावसाचा घनगंभीर आवाज.

बाहेर पाऊस कोसळतोय.. वेड्यासारखा. मन आंदोळतय आठवणींच्या झुल्यावर.. आणि टीव्ही वर चित्रपट चालू होतो - किल्ला ....

एक आठवीत शिकणारा मुलगा. वडील नुकतेच गेलेले. आईवर स्वतःला आणि या मुलाला सावरण्याची दुहेरी जबाबदारी. त्यात तिची कोकणात झालेली बदली. या सर्व अनपेक्षित बदलांना सामोरे जाताना त्या मुलाचे बदलणारे भावविश्व अतिशय प्रभावीपणे मांडले आहे या चित्रपटात.

हा मुलगा एकदम "good boy" या पठडीतला आहे हे सुरवातीलाच जाणवते. आईची घालमेल त्याला समजतेय. तिला जमेल तितके सांभाळून घ्यायचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण त्याचेही अल्लड वय आहे. लहानपण आणि तरुणपण यांच्या सीमारेषेवरील असलेले त्याचे मन हळुवार झाले आहे. नवीन शाळा, नवीन मित्र, त्यांची वेगळी भाषा, या सगळ्यांशी जुळवून घेता घेता काहीवेळा कोंडमारा होतो मनाचा. पण त्याबरोबरच परिस्थितीचा अबोल स्वीकार ही भावनाही कुठेतरी आईकडे बघता बघता जाणवतेय त्याला.

एके दिवशी तो आणि त्याचे नवीन मित्र गावाजवळच्या किल्ल्यापर्यंत सायकलची शर्यत लावतात. सर्वजण किल्ल्यावर पोचून मजेत दंगामस्ती करत असताना अचानक पाऊस सुरू होतो. हा मुलगा आणि त्याचे मित्र यांची चुकामूक होते. आणि काही काळ तो किल्ल्याच्या सानिध्यात एकटाच असतो.. कोसळणारा पाऊस अनुभवत. मग मित्रांबरोबरचा अबोला, पुन्हा जमलेली गट्टी आणि सर्व काही सुरळीत चाललेय असे वाटतं असतानाच आईची पुन्हा झालेली बदली. पुन्हा नवा गाव नवा देश आणि अर्थातच नवे अनुभव...

हे सगळे चित्रीकरण इतके सुरेख आहे की आपल्या आजूबाजूलाच ते घडतेय असे सारखे वाटत राहते. त्यातून कोकण आणि पाऊस.... इतके मुसळधार आणि हिरवेगार गारुड आहे ना चित्रपटभर की तोच एक अनुभव होऊन जातो. संवाद फारसे नाहीतच. भाषाही उगीचच अलंकारिक नाही. सगळा नजरेचा, आणि बदलणाऱ्या चेहऱ्यांचा खेळ. पण खरे आयुष्य तरी शब्दबंबाळ कुठे असते हो? ते तर अनेक निवांत आणि आश्वासक क्षणांमधूनच उलगडत जाते ना हळूवार...

नक्की बघा हा चित्रपट - अमृता सुभाषसाठी, छोटया चिन्मय साठी (अर्चित देवधर), त्याच्या मित्रांसाठी आणि हो, कोंकण आणि पावसासाठीसुद्धा !!!




 

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...