Monday, December 19, 2011

प्रेम भावे जीव जगी या- अर्थात संगीत मानापमान..

बरयाच दिवसांनी रविवारची संध्याकाळ अगदी हवी तशी, कल्पनेतली घालवता आली..
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.
नाटक: (पुन्हा नव्याने, नव्या संचात) संगीत मानापमान..
माझे सासूसासरे काही दिवस आमच्याकडे राहायला आले आहेत. आमच्या घरात सर्वच संगीतातील दर्दी! (अर्थात माझा अपवाद वगळता..) त्यामुळे मानापमान पुन्हा रंगभूमीवर आले आहे, आणि त्याचे पुण्यात चारच प्रयोग होणार आहेत, हे कळल्यावर माझ्या सासऱ्यांनी लगेच त्याची पाच तिकिटे काढून आणली सुद्धा! (कालचा प्रयोग आमच्यासाठीही एका गोष्टीचा शुभारंभ करण्याचा होता - माझ्या अडीच वर्षाच्या पिल्लाला आम्ही पहिल्यांदा theatre मध्ये नेणार होतो. चांगली गोष्ट अशी, कि माझा मुलगा खूप लहानपणापासूनच नाट्यगीते, भावगीते, आणि अगदी मोझार्टच्या symphonies असे अनेक प्रकार अगदी तल्लीन होऊन ऐकतो. त्यामुळे तो कदाचित एकंदरीत नाटकाचे वातावरण, त्यातील पदे enjoy करेल असा आमचा होरा होता - जो सुदैवाने खरा ठरला.. :))
एखाद्या लग्नाला जाताना जशी तयारी करू ना आपण, तसा नट्टापट्टा (!) करून आम्ही सर्वजण वेळेच्या अर्धातास आधीच यशवंतराव ला पोहोचलो. (हो, पार्किंग चा problem नको..). शुभारंभाचा प्रयोग असल्यामुळे खरोखरच सनई-चौघडे, रांगोळी असे अगदी लग्नाचे वातावरण होते.. इतके छान वाटले म्हणून सांगू..!!
मूळ नाटकाच्या संहितेला धक्का न लावता, त्यातील पदांची लांबी थोडी कमी करून, राहुल देशपांडे, सायली पानसे आदी कंपूने, तीन तासांचा अगदी देखणा प्रयोग उभा केला आहे...
ज्यांनी मूळ मानापमान पहिले आहे, त्यांना हा प्रयोग कितीसा पटेल ते मला माहित नाही - पण माझ्या मते तरी अशी तुलना करून आपण, जे मनापासून एखादी जुनी गोष्ट पुन्हा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे श्रम हिरावून घेतो. तेंव्हा माझ्याकडून तरी या सर्व टीमला त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल मनापासून धन्यवाद...आणि खरे सांगू का, काही काही गोष्टी, विशेषतः. projector चा केलेला अफलातून वापर {खास करून भामिनी तयार होताना आरशात पाहत आहे तो प्रसंग..}, राहुल देशपांडे आणि सायली पानसे ची गायकी ह्या खरोखरच खूप खूप स्तुत्य आहेत..!!
आणखीन एक गोष्ट - हे नाटक म्हणजे अतिशय दर्जेदार नाट्यगीतांची खाणच आहे.. मी सकाळी office ला आले तरीही , तो hangover काही ओसरला नव्हता! खास करून, 'प्रेम भावे जीव जगी या' हे नाट्यगीत ऐकावेसे वाटले (कारण इतर बरीच नाट्यगीते सहज available आहेत महाजालावर..). मग काय, search केले, आणि खाली दिलेल्या लिंक वर खजिनाच मिळाला. आपणही जरूर भेट द्या -

http://gaana.com/#/streamalbums/Manapman_Drama_२२८१८



Sunday, December 18, 2011

राष्ट्र आपले; प्रगती आपली; पण जबाबदारी? ती कोणाची?

मला माहित आहे, की हा विषय अगदी चावून चोथा झालेला आहे. पण तरीही, जेंव्हा कोणी, 'अरे भाई, इस देश का क्या होगा?' असे म्हणून गळा काढते तेंव्हा अगदी राहवत नाही. शेवटी देश, देश म्हणजे तरी कोण हो? तुम्ही आम्हीच ना? मग? शेवटी आपण नेऊ त्याच दिशेला जाईल नं देश आपला?
माझा नवरा यासंदर्भात एक खूप साधे पण पटणारे व्याक्य बोलतो नेहमी. त्याच्या मते, आपण कोणीच देशासाठी काही केले नाही तरी चालेल एकवेळ, पण स्वतःची कामे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करावीत. तरीही खूप गोष्टी सोप्या होतील. 
म्हणजे बघा हं, आपण सगळे कोणत्याही गोष्टीसाठी आजूबाजूच्या परिस्थितीलाच कायम दावणीला बांधत असतो. पण या सगळ्यामध्ये आपणही परिस्थितीचाच एक अविभाज्य घटक आहोत हे सोयीस्करपणे विसरतो. पेट्रोलचे भाव वाढले, करा संप! वाढती महागाई - करा आंदोलने! आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला - काढा मोर्चे! करा जाळपोळ! नाही नं पडले दान आपल्या मनासारखे - मग उधळून टाका सगळा डाव... नं  रहेगा बांस, नं बजेगी बासुरी..!!!
खरच इतके कठीण आहे का जबाबदारीने वागणे? मला तर ठामपणे असे वाटते की येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाकी कुठलेही (पूर्ण न होणारे) संकल्प सोडले नाही तरी चालतील पण स्वतापुरते काही नियम बनवायला काय हरकत आहे? जसे की -
१) मी कोणालाही दिलेली वेळ व दिलेला शब्द पाळेन.
२) मी माझ्या घरातील शक्य तितक्या कामात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
३) मी कचरा नेहेमी कचरापेटीतच टाकेन. (आजूबाजूला कचरापेटी नसली, तर छोट्या छोट्या गोष्टी, जसे की chocolate चे wrapper  माझ्याजवळ ठेवेन, व घरच्या कचरापेटीत टाकेन.)
४) मी मला नेमून दिलेले काम मन लावून करेन, व त्यामध्ये सुधारणा कशा करता येतील याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन.
५) मी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी  थुंकणार नाही.
६) मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीन.
७) मी मला नेमून दिलेले काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाच स्वीकारणार नाही, अथवा तशी अपेक्षाही करणार नाही.
८) मी लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्याशी प्रेमाने,सन्मानाने वागेन, व त्यांना शक्य तितकी मदत करेन.
९) मी एखादे मत व्यक्त करताना दुसऱ्याच्या भावनांचा जरूर विचार करीन. मी आजूबाजूच्या माणसांना न दुखावण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन.
१०) माझ्या पैश्याबरोबरच माझा थोडासा वेळही माझ्या कुटुंबियांसाठी देईन.
ही यादी फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. यात अजून कितीतरी गोष्टींची भर टाकता येईल. आपल्याकडे आहेत अशा काही छोट्या छोट्या कल्पना, ज्यामुळे आपला समाज अधिक सुंदर, अधिक मोकळा होईल आणि प्रगतीपथाकडे जाईल?






Friday, December 16, 2011

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

वाचकहो,
लेखाचे शीर्षक वाचून 'आज हिला एकदम प्रवचन देण्याचा मूड आलेला दिसतोय' असा विचार करून घाबरून जाऊ नका हं ! खरे तर या शीर्षकाची philosophy ही श्री. वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या बोधवाक्याशी जुळणारी असली तरी त्यामागचा संदर्भ मात्र वेगळा आहे -
माझ्या सुदैवाने मला आयुष्यात नेहमीच चांगली माणसे भेटली. कितीतरी जणांकडून असंख्य गोष्टी शिकता आल्या. हे शिकणे अखंड सुरु आहे...
तर एकदा मी आणि माझा -friend, philosopher, and guide असा- समविचारी सुहृद, एका विषयावर चर्चा करत होतो - विषय होता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी निर्मळ मनाने प्रयत्न करण्याबद्दल ! बोलता बोलता माझ्या मित्राने 'Death at a Funeral'  या गाजलेल्या चित्रपटातील एका पात्राच्या तोंडी असलेला परिच्छेद थोडेसे बदल करून सांगितला. तो मला इतका भावला, की तोच आज तुमच्यासमोर ठेवत आहे -

" We may not be perfect persons, but we are good people. So, may be, maybe there are somethings we would like to do. Life isn't simple. It's complicated. We're all just thrown in here together, in a world full of chaos, confusion, a world full of questions and no answers, death always lingering around the corner, and we do our best. But we can't do our best every time. We have to go for what we want in life because we never know, how long we're going to be here. And whether you succeed or fail, the most important thing is to have tried. And apparently, no one will guide you in the right direction. In the end, you have to learn for yourself, you have to grow up yourself.... "


म्हटले तर किती साधा सोपा विचार.. पण किती वेळा अमलात आणतो आपण तो? बरयाच वेळा अपयशाच्या भीतीने आपण एक पाऊलही पुढे टाकत नाही..  अरे भाई, क्यू डरते है हम नाकामयाबिसे? क्यू नही बताते हम अपने आपको के  हमने कोशिश तो की..
मुख्तसर सी बात ही सही.. लेकीन असार तो बहोत बडा है... !!
काय पटते ना? 




Thursday, December 15, 2011

Sometimes NOTHING is EVERYTHING...

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी Julia Roberts चा Eat, Pray, Love हा चित्रपट टीव्हीवर पाहत होते. Julia च्या इतर अनेक चित्रपटांच्या मानाने हा तसा संथ गतीचा आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. कदाचित  म्हणूनच की काय, तो हळूहळू आतमध्ये मुरत जातो आणि मग आपण चित्रपटातील philosophy वर कधी विचार करायला लागतो हे आपले आपल्यालाही कळत नाही...
तर आयुष्याचा अर्थ शोधायला निघालेली एक मनातून अस्वस्थ अशी स्त्री.. तिला जगभर फिरताना काय काय अनुभव येतात आणि मग त्या अनुभवांचा एक घटक होताना ती आतून  कशी शांत, समाधानी  होत जाते याची ही कथा आहे. या प्रवासात एका टप्प्यावर ती इटलीला येऊन पोचते. तिथे काही दिवस व्यतीत करताना  तिला त्या लोकांच्या कायम तोंडावर असलेले एक वाक्य खूप भावते - "ll dolce far niente"  अर्थात "the sweetness of doing nothing" ....
चित्रपट चालू असताना हे वाक्य आले आणि त्याने मनाचा कब्जा घेतला. एका दृष्टीने हा तसा नवीन विचार होता. - "the SWEETNESS of doing NOTHING ?? "  काही न करण्यातील गोडवा, आनंद ?? - अरे, इतके दिवस तर आपण कृतीशील असण्याबाद्दलचे कितीतरी विचार ऐकले. 'आराम हराम आहे' हेच आपल्यावर सतत बिंबवले गेले आहे. मग हे काय वेगळेच बरे? मी हळूहळू अंतर्मुख होत होते ... आणि एका क्षणी मला जाणवले की आपण आतून शांत शांत झालो आहोत... एका कुहरात हरवलो आहोत, ज्याच्या पलीकडे प्रकाश आहे की नाही याचीही आपल्याला फिकीर नाही... आणि मग अचानक वरील वाक्याचा अर्थ गवसला.... समाधी, समाधी म्हणतात ती याहून वेगळी असेल का?
खरच, एरव्ही आपण अगदी एकटे असतानाही  किती गजबजाटात हरवलेलो असतो ना? कामवालीच्या दांड्या, मुलांची शाळेची घाई, बॉसच्या deadline ची आठवण करून देणाऱ्या मेल्स, traffic चा त्रास, सहकाऱ्यांच्या कटकटी, संप, बंद, रोजचा पेपर वाचूच नये असे फिलिंग देणाऱ्या आतील बातम्या, पेट्रोल चे अखंड वाढते दर... एक ना दोन, हजार कटकटी.. काही आपल्या आवाक्यातील, तर बरयाचश्या आपल्या कुवतीबाहेरच्या...तरीपण आपण त्यांच्यावर विचार करणे, वैतागणे थांबवत नाही.. आणि हा सगळा भार पडतो आपल्या मनावर... ते बिचारे निमुटपणे हा ताण सहन करत राहते... पण किती दिवस?
चला मग, आता आपल्या मनाला थोडी विश्रांती देऊ या का? असे करायचे, की घरातलाच एक कोपरा निवडायचा...अगदी कुठलाही... आणि तिथे सर्व शरीर सैलावून बसायचे... मग अलगद डोळे मिटायचे.. मनातील विचारांना, त्यांना हवे त्या दिशेला जाऊन द्यायचे.. पण आपण मध्ये लुडबुड करायची नाही हं.. आताचा वेळ हा फक्त आपल्या मनाचे ऐकायचा आहे... गम्मत म्हणजे, आपण घाईत असताना, कधी एकदा आपल्याला शांतपणा मिळेल याची वाट बघत असतो, पण जेंव्हा खरोखरच शांतपणे बसायची वेळ येते तेंव्हा ते वाटते तितके सोपे नाही हं... बरोबरच आहे, आपण कायम आपल्या मनाला मारून मुटकून एका कोपरयात बसवत असतो. आता आपण कोपरयात बसून मनाला हवे तसे बागडून द्यायचे म्हणजे काय? ...
पण या अवस्थेत काही वेळ गेल्यावर, खरच खूप खूप वेगळे वाटते.. थोड्या वेळाने आपण शांतपणे डोळे उघडतो तेंव्हा अगदी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते.. भिंतीवर पडलेला उन्हाचा कवडसाही वेगळे रूप घेऊन येतो आपल्यासाठी.. पानांची सळसळ, गच्चीतील कबुतरांचे मंद घुमणे, कुठेतरी दूर देवळात वाजणारी घंटा, स्वयंपाकघरात कढवल्या जाणारया लोण्याचा खरपूस वास, घरातील लहान मुलाचे खुदुखुदू हसणे, देवघरातील उदबत्तीचा मंद सुगंध, प्रेमाने रान्धलेल्या अन्नाची जिभेवर रेंगाळणारी चव या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या चेहेरयावर हसू उमटवतात.. कोंडलेला श्वास मोकळा होतो...आपण नव्याने सज्ज होतो... आयुष्याची लढाई लढण्यासाठी.. नव्हे, आयुष्य समरसून जगण्यासाठी....तेंव्हाच कुठेतरी जाणवते - खरच... Sometimes NOTHING is EVERYTHING....



Wednesday, December 14, 2011

रोपटे नात्यांचे - खुराक गप्पांचा..!!

वाचकहो,
आज माझा मानवी नातेसंबंधांबद्दल लिहायचा मूड आहे. 

आमच्या घरातील सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मी आणि माझे पतीदेव (!) खूप वेगवेगळ्या विषयांवर खूप छान गप्पा मारू शकतो. हो, अगदी तासनतास.. दोघांची कधीकधी अगदी जुळणारी मते, किंवा काही वेळा होणारे मतभेद... पण हे सर्व क्षण आम्हाला पुन्हा नव्याने जगायची उर्मी देतात. आम्ही दोघेही असा फक्कड गप्पांचा मूड लागण्याची वाट पाहत असतो जसे काही. Most beautiful thing about our relationship is that we almost never get bored in each other's company... आणि आम्हा दोघांना असे आवर्जून वाटते कि कोणतेही नाते टवटवीत, ताजे ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते त्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी बोलणे.. मनापासून स्वतःला व्यक्त करणे.. आणि हे मी फक्त नवराबायको या नात्याविषयी म्हणत नाही आहे. कुठल्याही नात्याचे रोपटे जगवण्यासाठी त्याला खूप साऱ्या गप्पांचा खुराक मिळणे अति-आवश्यक आहे...

खेदाची गोष्ट अशी आहे, कि बहुतेक सर्वजण इथेच मार खातात. आपण सर्वजण खूप बोलतो, पण त्यातून भावना पोहोचवतो का? - खास करून चांगल्या भावना... आपण सर्व कानाने ऐकतो जरूर, पण ते आपल्या हृदयापर्यंत पोचते का? 

खरेतर या एका अर्थाने मुक्त समाजात, आपण खरोखरीच मनाने मुक्त आहोत का हा माझ्यासाठी एक प्रश्नच आहे. माझ्यामते तरी मोकळेपणा म्हणजे समोरच्याला आपल्या भावना, आपले विचार कोणताही आडपडदा न ठेवता सांगायचे स्वातंत्र्य ! आपली जवळची, जीवाभावाची नाती जपतानाच नवीन नाती निर्माण करायची, वेगळे विचार, वेगळे अनुभव यांना मोकळेपणाने सामोरे जायचे ही मानसिकता ! 

खर सांगू का तुम्हाला, आपण समोरच्या माणसाचा कुठल्याही लेबल शिवाय विचारच करत नाही.. आपल्यासाठी हा काळा असतो तर ती खूप आगाऊ असते. ही खूप कंजूस असते तर तो खडूस... किती बंद बंद करून ठेवत असतो न आपण आपली मने ...आणि एक स्त्री आणि एक पुरुष बोलत असले तर काय, बघायलाच नको. आपले मन घोड्यासारखे एकाच सरळ रेषेत विचार करत धावत असते.. आपल्या गावीही नसते, कि आपण आयुष्य सुंदर करण्याच्या कितीतरी संधी धुडकावून लावत असतो... अगदी सहजपणे...!!
हा लेख वाचता वाचता जरा आठवून पहा बरे- किती वेळा आपण जाणता अजाणता समोरच्याला अतिशय जिव्हारी लागेल असे बोललोय.. किती वेळा दुसऱ्यांचे सहानभूतीपूर्वक ऐकून घेतले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खूप खूप मनात असूनही केवळ न बोलल्यामुळे, अनेक सोनेरी क्षण तसेच फुकट घालवले आहेत...
तुम्ही म्हणाल की या दृष्टीकोनातून आपण अख्ख्या जगाशी वागायला लागलो तर आपले मन म्हणजे समोरच्यासाठी एक आरसाच होईल. आणि मग त्याची काच तडकायलाही फार वेळ लागणार नाही. कबूल ! शंभर टक्के बरोबर..!! आणि म्हणूनच तुम्ही सर्वांशी अशाच मोकळ्या मनोवृत्तीने वागा असा दुराग्रही सल्ला नाही द्यायचाय मला... अहो, पण आपल्या अतिशय जवळची माणसे, आणि -आपण ज्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहोत, अशी काही अनाम नाती- यांच्या बाबतीत तरी पाळता येईल की नाही हे पथ्य? आणि पथ्य कुठले - तर नात्यामधील कुठलेही गैरसमज हे एकमेकांशी शांतपणे बोलून संपवून टाकायचे आणि जर आपल्याला दुसरयाची कोणतीही (अगदी छोटीशी का होईना ) गोष्ट आवडलेली असली तर त्याची पोट भरून पोचपावती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची..मग पहा, त्या व्यक्तीच्या डोळ्यातील कृतज्ञतेची निरांजने तुम्हाला आयुष्यभराचा समाधानाचा प्रकाश देतील...
तुम्हाला मी माझ्याबाबतीतच घडलेली छोटीशी गोष्ट सांगते.. मला आवडलेले एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमधील गुण हे त्या व्यक्तीला पत्ररूपाने सांगण्याची माझी सवय आहे.. (कदाचित लिहायला खूप आवडते त्याचा परिणाम असेल..) तर, झाले असे, की मी माझी आधीची नोकरी सोडून या नव्या नोकरीत रुजू होणार होते.. अर्थात ही नवीन नोकरी मी केवळ मला कार्यक्षेत्र बदलायचे होते म्हणून स्वीकारली होती. आधीच्या नोकरीतही माझ्या माणसांविषयी काहीच तक्रारी नव्हत्या. त्यातून माझे बॉस म्हणजे अगदी देवमाणूस होते. कंपनीत सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत. तर अशा माणसापुढे मी जड अंतकरणाने माझा राजीनामा ठेवला. ते काही बोलले नाहीत, पण त्यांना वाईट वाटलेले त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो दिवसभर मी अतिशय उदास होते. शेवटी न राहवून मी माझ्या त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी लिहून काढल्या व दुसऱ्या दिवशी ते पत्र त्यांच्या हातात ठेवले. त्यामध्ये खूप छोट्याछोट्या अशा गोष्टी होत्या ज्यावेळी सरांनी आम्हाला खूप समजून घेतले होते. माझ्या कुटुंबियांचा सरांप्रती असलेला आदर पण त्या पत्रात व्यक्त झाला होता. सरांनी ते पत्र मनापासून वाचले. त्यावेळी त्यांच्या चेहेऱ्यावर पसरलेला निर्व्याज आनंद मी कधीही विसरू शकणार नाही...
बरोबर एका आठवड्याने आमचे लाडके सर आम्हा सर्वाना सोडून देवाघरी निघून गेले....
त्यांच्या अचेतन शरीराकडे पाहून रडताना, मनात कुठेतरी समाधान होते - या माणसाच्या चेहेऱ्यावर खरे हसू आणण्यात आपलाही खारीचा वाटा होता याचे...!!
असो, थोडेसे विषयांतर झाले असेल कदाचित, पण जाणवतेय ना आपल्याला, मला काय सांगायचे आहे ते - आयुष्य कुणाचाही द्वेष करण्यासाठी खूप लहान आहे... आणि शेवटी आपण जपलेली नाती, हेच तर आपले आयुष्य आहे, नाही का? 
तेंव्हा Pink Floyd गाण्यात म्हणतो तसे - KEEP TALKING !!










Friday, December 9, 2011

कधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...2



ऑस्कर वाईल्ड हा एकोणिसाव्या शतकातला एक महान लेखक व तत्ववेत्ता. त्याच्या थोडयाश्या उपहासपूर्ण तरीही चुरचुरीत शैलीची आजही अनेकांना भुरळ पडते. त्याचीच काही प्रसिद्ध quotes खाली वानगीदाखल देत आहे -

1) I am so clever that sometimes I don't understand a single word of what I am saying.
2) I can resist everything except temptation.
3) I have nothing to declare except my genuis.
4) I have the simplest tastes. I am always satisfied with the best.
5) I think that God, in creating man, somewhat overestimated his ability.
6) If you are not too long, I will wait here for you all my life.
7) It is a very sad thing that nowadays there is so little useless information.
8) It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.
9) A gentleman is one who never hurts anyone's feelings unintentionally.
10) A man's face is his autobiography. A woman's face is her work of fiction.
11)Morality is simply the attitude we adopt towards people whom we personally dislike.
12) No man is rich enough to buy back his past.
13) As long as a woman can look ten years younger than her own daughter, she is perfectly satisfied.
14) The old believe everything, the middle-aged suspect everything, the young know everything.
15) I have met a lot of hard-boiled eggs in my time, but you're twenty minutes.


वरील सर्व वाक्ये ही केवळ नमुन्यादाखल, उत्सुकता जागृत करण्यासाठी दिलेली आहेत. मला आवडलेली यादी वरील यादीपेक्षा किमान वीस पटीने मोठी आहे.


ऑस्कर वाईल्डविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण खालीलपैकी दुवे वापरू शकता -
1) http://www.brainyquote.com/quotes/authors/o/oscar_wilde_8.html
2) http://thinkexist.com/quotations/funny/
3) http://en.wikipedia.org/wiki/Oscar_Wilde
4) http://www.online-literature.com/wilde/
5) http://cmgww.com/historic/wilde/
6) http://www.oscarwildecollection.com/
7) http://www.goodreads.com/author/quotes/3565.Oscar_Wilde
8) http://www.oscarwilde.com/welcome.html
9) http://www.wilde-online.info/
10) http://www.oscarwildesociety.co.uk/














Wednesday, December 7, 2011

कधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...

वाचकहो, 

आता पुढील काही भागांमधून मी, मला भावलेले, पटलेले असे मायाजालावरील लिखाण आपल्याशी शेअर करणार आहे. मग तो एखादा लेख असेल, किंवा एखादी छानशी कविता! काहीवेळा कुणा थोर शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, संत अशा कुणाचीही मते येतील ! इथे काहीही वर्ज्य नाही. अर्थात लेखाबरोबर योग्य ती लिंक जोडली जाईलच. म्हणजे कुणाला त्या विषयावरील अधिक माहिती हवी असेल तर ती व्यक्ती त्या लिंक चा वापर करू शकेल.. 
माझ्या बाजूने म्हणाल तर, वेगवेगळे विषय मनसोक्त हाताळण्यासाठी मी माझ्या बाजूने फक्त एक सुरुवात करीत आहे. आपल्या अभिप्राय, प्रतिक्रिया आणि टीकेचे स्वागत आहे...

तर आजचे मत हे थेट धर्मावर भाष्य करणारे! पॉल डीराक नावाचा अतिशय बुद्धिमान, नोबेल पदक विजेता  पण तितकाच अबोल असा थोर भौतिक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने धर्मावर काय परखड, पण अतिशय पटणारे असे भाष्य केले आहे ते त्याच्याच शब्दात - 

“I cannot understand why we idle discussing religion. If we are honest—and scientists have to be—we must admit that religion is a jumble of false assertions, with no basis in reality. The very idea of God is a product of the human imagination. It is quite understandable why primitive people, who were so much more exposed to the overpowering forces of nature than we are today, should have personified these forces in fear and trembling. But nowadays, when we understand so many natural processes, we have no need for such solutions. I can't for the life of me see how the postulate of an Almighty God helps us in any way. What I do see is that this assumption leads to such unproductive questions as why God allows so much misery and injustice, the exploitation of the poor by the rich and all the other horrors He might have prevented. If religion is still being taught, it is by no means because its ideas still convince us, but simply because some of us want to keep the lower classes quiet. Quiet people are much easier to govern than clamorous and dissatisfied ones. They are also much easier to exploit. Religion is a kind of opium that allows a nation to lull itself into wishful dreams and so forget the injustices that are being perpetrated against the people. Hence the close alliance between those two great political forces, the State and the Church. Both need the illusion that a kindly God rewards—in heaven if not on earth—all those who have not risen up against injustice, who have done their duty quietly and uncomplainingly. That is precisely why the honest assertion that God is a mere product of the human imagination is branded as the worst of all mortal sins.”


वरील मत वाचले होते ते - 

या दुव्यावर. 
डीराक विषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या साईटना अवश्य भेट द्या. हा शास्त्रज्ञ माणूस म्हणूनही तितकाच थोर होता. 


Friday, November 18, 2011

देऊळ ....( तू झोप मी जागा आहे...)!!

तशी मी नास्तिकच! म्हणजे गणपतीबाप्पा, शंकर, सरस्वती वगैरे आपली दोस्त मंडळी आहेत हे खरे; पण उगीचच त्यांच्या नावे काहीतरी वाट्टेल त्या कथा खपवायच्या, भक्ती आणि आस्तिकतेचा बाजार भरवायचा, आंधळेपणाने, सारासार विवेक न वापरता धर्म, रूढी, प्रथा वगैरे गोष्टीना शरण जायचे हे सपशेल, त्रिवार नामंजूर आहे आपल्याला !! तुम्हीपण आहात का त्यातले? मग ह्या देवळात जरूर जा !
काय म्हणता? तुम्ही आस्तिक आहात, पण तुमची श्रद्धा, तुमचा देव तुमच्यापाशी, असे तुम्हाला वाटते? अरे.. मग तुम्हाला या चित्रपटातील केशव उर्फ केश्या अगदी जवळचा वाटून जाईल.
आणि आपण? आपल्यासाठी देव म्हणजे स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घ्यायचे एक हुकमी साधन आहे का? वा... फार छान...!! हा चित्रपट आपल्यासारख्या संधिसाधू प्रवृत्तींना डोळ्यासमोर ठेवूनच तर बनवला आहे.. म्हणजे पर्यायाने आपणच याचे हिरो झालात की !! तेंव्हा आपली हिरोगिरी पडद्यावर साकारली जात असताना पाहणे हे खूप सुखद असेल आपल्यासाठी.. तेंव्हा आपलेही या देवळात स्वागत !! परत जाताना देवाचा प्रसाद म्हणून थोडे शहाणपणाचे, माणुसकीचे तीर्थ घेऊन गेलात तर अतिउत्तम .. !!
(वरील काही वाक्ये तिरकसपणे लिहिलेली वाटतील कदाचित.. नव्हे ती तशी मुद्दामच लिहिली आहेत..एकंदरीतच चित्रपट पाहत असताना जो अनुभव सतत येत राहतो त्या अवस्थेचा फील तुम्हाला यावा  म्हणून..).
तर हा चित्रपट म्हणजे समाज मनाचा एक आरसा आहे. अतिशय थेट, स्पष्ट, आणि तितकाच प्रामाणिक ! समाजातील विविध प्रवृत्ती, राजकारण्यांची हतबलता आणि समाज सुधारणेच्या बाबतीत असलेली निष्क्रियता, बुद्धीजीवींची तळमळ आणि प्रवाहापुढे झालेला नाईलाज, भोळ्या-निरागस जीवांची दिशाहीनता, समाजातील स्त्रीचे खरे स्थान, अशा अनेक विषयांवर एकाच वेळी मार्मिक, बोचरे भाष्य करणारा असा हा अडीच तासांचा प्रवास, जो उभा केला आहे उमेश कुलकर्णी या संवेदनशील दिग्दर्शकाने !! या प्रवासात त्याचे सोबती कोण आहेत माहित आहे? - नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, आतिशा नाईक, आणि हो - नसिरुद्दीन शाह !! यातील प्रत्येक नावाभोवती असलेले वलय पाहता, काहीतरी वेगळे पाहायला मिळणार याची खात्री सुरुवातीलाच पटते, आणि चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी आपली अवस्था आणखीनच भारून गेल्यासारखी होत जाते. अतिशय संथ गतीत सुरु झालेला हा चित्रपट हळूहळू आपल्या अंगावर येऊ लागतो.. बेचैन करतो.. डोळ्यात अंजन घालतो आणि शेवटला परत एका समेवर येऊन थांबतो.. !!
हा चित्रपट - हि समस्या आणि हे त्याचे उत्तर - अशा निर्णायक भाषेत बोलत नाही. पण समाजात, अगदी आपल्या आजूबाजूला जे घडते त्याचे शंभर टक्के सत्य असे चित्रीकरण करतो. प्रत्येक मनोभूमिकेमागील निरनिराळे कंगोरे, नाण्याच्या एक-दोन नव्हे तर असंख्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक मंगरूळ नावाचे आडगाव. जिथे काही घडतच नाही, आणि काही घडत नाही म्हणून गावातील तरुण पोरांपासून ते एका स्वयंघोषित पत्रकारापर्यंत सगळेच खूप निरुत्साही, कंटाळलेले आहेत. अशा गावात राहणाऱ्या आणि गावातील एका बड्या आसामीच्या घरची गाय राखण करणाऱ्या केशव, उर्फ केश्या या तरुणाच्या स्वप्नात एकदा दत्तगुरु येतात.. अशा वरकरणी सध्या सरळ वाटणाऱ्या घटनेतून सुरुवात होऊन हा चित्रपट कुठल्याकुठे जातो.. आणि ते ही अतिशय गतिमान प्रकारे..!! या गतीमुळे कोणाची चांदी होते, कोण चक्राखाली भरडले जाते, हे सर्व पडद्यावरच पाहणे इष्ट...!!
यातील मार्मिकतेने रेखाटलेल्या प्रसंगांपैकी एकाचे उदाहरणच द्यायचे झाले तर गावातील पुढारी भाऊ (नाना पाटेकर) व गावाविषयी तळमळ असणारे सुधारकी विचारांचे अण्णा (दिलीप प्रभावळकर) यांच्यातील संवादाचे देता येईल. त्यामध्ये अण्णा तळमळीने बोलत असता शेवटी भाऊ त्यांना सांगतात, " अहो अण्णा, अलीकडे कायदा, पलीकडे आम्ही, आणि मध्येच भक्तांची रांग..!! कायद्याला आमच्यापर्यंत येण्यासाठी ही रांग ओलांडावीच लागणार. तेंव्हा तुम्ही काळजी करू नका.. सर्व काही कायदेशीरच होईल !!"  कायदा हातात घेऊन आपल्याला हवा तसा वाकविण्याच्या सत्ताधीशांच्या प्रवृतीचे याहून नेमके वर्णन मला तरी माहित नाही..!!
या चित्रपटाची philosophy म्हणा, हवं तर, ही अण्णांच्या एकाच वाक्यात करता येईल. ते म्हणतात - देव ज्याला मानायचा असेल त्याने मानावा, ज्याला मानायचे नसेल त्याने मानू नये, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.. "
पण हा वैयक्तिक प्रश्नच बघताबघता सार्वजनिक रूप कसे धारण करतो आणि समाजमनाच्या जाणीवा कश्या बंदिस्त करतो हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा...!!!


Wednesday, November 2, 2011

भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मगाथा- अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!!

शनिवार - ३ मे १९१३.. एका महाप्रचंड अशा उद्योगाचे बीजारोपण केले गेले तो दिवस.. या दिवशी भारतातील  पहिला मूकपट प्रदर्शित झाला. नाव होते - राजा हरिश्चंद्र. ह्या अनोख्या प्रयोगाची संकल्पना ज्यांनी मांडली ते होते अर्थातच दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक..!!

पण ही झाली नंतरची गोष्ट. 

मुळात दादासाहेबांना ही प्रेरणा कशी मिळाली, त्या काळात त्यांना काय अडचणी आल्या, त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या कुटुंबियांची (विशेषतः पत्नीची) कशी साथ लाभली ह्या सर्वांचीच एक रंजक कथा जर पडद्यावर सादर करता आली तर? प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दूरदृष्टी, अपार कष्ट आणि त्याग यांची किमान एक झलक दाखवता आली तर? 

असे अनेक प्रश्न पडले ते परेश मोकाशी या जादूगाराला.. मग काय, या छोट्याश्या बीजातून तयार झाला तो एक ध्यास.. प्रवास.. ! या प्रवासात जर अतिशय गुणी, मेहनती  असे सोबती असतील तर काय साकारू शकते याचे एक उत्तम उदाहरणच या अवलियाने आपल्यासमोर ठेवले - ते बावनकशी सोने म्हणजेच माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक - अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!! 

खरेतर हा फक्त संग्रही ठेवण्याचा (आणि 'आम्हीपण नावाजलेले चित्रपट सीडीवर पदरी बाळगतो' असा टेंभा मिरवण्याचा) चित्रपट नव्हे ! माझ्यामते तरी हे एक tonic आहे. केंव्हाही नैराश्य आले, आयुष्यात आपल्याला काहीच करता येणार नाही असे वाटले कि सरळ (तीच संग्रही ठेवलेली) सीडी काढावी व पुढचे दोन तास निवांतपणे हा चित्रपट पाहावा. विश्वास ठेवा, चित्रपट पाह्ण्यापूर्वीचे आपण व चित्रपट पाहून झाल्यानंतरचे आपण यात तुम्हाला स्वतःलाच अमूलाग्र बदल झालेला जाणवेल. 

हा चित्रपट दादासाहेबांच्या जीवनावर बेतला असल्यामुळे त्यांचे कार्य हा अर्थातच चित्रपटाचा आत्मा आहे. गिरगावच्या चाळीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत असतानाच हा अवलिया 'पडद्यावरील नाटक' प्रत्यक्षात आणण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी लंडनला जातो, मग भारतात परत येऊन या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी जंग जंग पछाडतो, आणि सरतेशेवटी पडद्यावर उभी राहते ती राजा हरिश्चंद्राची गोष्ट.. आणि त्याबरोबरच जाणवतो तो फाळके कुटुंबाचा स्वप्नपूर्तीचा आनंद..

माझ्या मते तरी हा चित्रपट आपल्याला भारून टाकल्यासारखा वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. चित्रपट सुरु होत असतानाच जवळपास १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या मुंबईचे दर्शन घडते (आणि लगेच जाणवते कि एवढे अत्युच्च दर्जाचे नेपथ्य नितीन चंद्रकांत देसाई या मयसभाकाराखेरीज कुणाचेच असू शकत नाही..) त्या गिरगावातील चाळी, त्यातील एकोपा, एकमेकांविषयी वाटणारी तळमळ, त्या रस्त्यावरील ट्राम्स, 'दादर ला फारशी वस्ती नव्हती" हे वास्तव... सगळे तुम्हाला १०० वर्षे मागे घेऊन जाते. (मला तर नेहेमी हा चित्रपट पाहताना 'आपण १०० वर्षापूर्वी जन्मलो असतो तर किती छान झाले असते ' असे वाटत राहते. )

हे सर्व असले(आणि ते सर्वोत्तमच आहे) तरीही शेवटी कुठल्याही कलाकृतीचे तारू यशस्वीपणे किनारयाला लावतात ते त्यातील कलाकारच.. आणि इथे दिग्दर्शकाने नंदू माधव व विभावरी देशपांडे यांना मुख्य भूमिका देऊन अर्धी (माझ्यामते, जवळपास पूर्ण) लढाई जिंकली आहे. 'दादासाहेब अगदी असेच असतील' हे वाटण्यामागे नंदू माधव या गुणी कलाकाराची अफाट मेहनत आहे. ती सिनेमा बनवण्याची तळमळ, त्यासाठी वाट्टेल तसे आणि तितके कष्ट उपसण्याची तयारी, त्याचवेळी दादासाहेबांमध्ये दडलेला प्रेमळ पिता, कृतज्ञ पती, असे अनेक पैलू त्यांनी अतिशय बारकाव्यांसहित उभे केले आहेत. त्यांना तितकीच ताकदीची जोड मिळाली आहे ती विभावरी देशपांडे या अष्टपैलू अभिनेत्रीची. तिने उभी केलेली दादासाहेबांच्या पत्नीची व्यक्तिरेखा खरोखर कमाल आहे. पतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कंबर कसून उभे राहतानाच, तीन मुलांचे पालनपोषण, चित्रपटात काम करणाऱ्या ३०-४० माणसांचे जेवणखाण, आणि या सर्वांवर कळस म्हणजे दादासाहेबांच्या बरोबरीने कॅमेरा हाताळणे, फिल्म धुणे अशी कामे हसतमुखाने करणे या सगळ्यामुळे त्या व्यक्तिरेखेने एक वेगळीच उंची गाठली आहे. 

हे झाले मुख्य कलाकारांबद्दल. पण मोहित गोखले, अथर्व कर्वे या मुलांपासून ते वैभव मांगले यांच्यासारख्या विनोदी कलाकारापर्यंत प्रत्येकानेच १०० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान दिले आहे चित्रपटाच्या एकंदर जडणघडणीत...एक आदर्श team-work चे उदाहरण म्हणूनही हा चित्रपट भावतो कुठेतरी. शिवाय '२००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भारतातर्फे "सर्वोत्कृष्ट चित्रपट" म्हणून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवले गेले होते'  ही याची एक ओळख आहेच...

तेंव्हा, स्वप्ने पाहणे, ती सत्यात आणण्यासाठी अफाट मेहनत करणे, आणि शेवटी स्वप्नपूर्तीचा झालेला निखळ आनंद, हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा..!!

Tuesday, August 16, 2011

पाऊस .. आठवणींचा मोरपिसारा..!

वाचकहो,
आज थोडा ब्रेक घेऊन पावसाविषयी लिहावेसे वाटत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
सकाळी कामावर निघाल्यापासून पावसाची रिपरिप चालू झाली होती, तरीही छत्री न घेताच बाहेर पडले. सुदैवाने, खूप भिजले नाही, आणि तरीही बऱ्याच दिवसांपासून मनात धरून ठेवलेली इच्छा पूर्ण झाली - पाऊस अनुभवण्याची! रमत गमत येताना मनात पावसाचीच अनेक रूपे फेर धरत होती. तशातच मला मी काही महिन्यांपूर्वी 'मनोगत' वर टाकलेल्या पोस्टची आठवण झाली. मग वाटले, कि आपली पावसाविषयीची भावना तुम्हा सर्वांपर्यंत का पोचवू नये? वाचून पहा तर, तुम्हीही लेखातल्या कोणत्या ना कोणत्या भागाशी स्वतःला relate कराल अशी मला आशा, नव्हे खात्रीच आहे....

तर पाउस -
हा फक्त एक शब्द नाही. हे एक गारूड आहे. मधमाश्यांचे असे पोळे की ज्याला एक छोटासा दगड चुकून जरी लागला तरी त्यातून अनंत आठवणीचे मोहोळ उठते.
या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असंख्य माणसे व प्रत्येकाचे आपले असे वेगळे विश्व! पण तरीही सर्वांना एका नाजूक धाग्याने बांधून ठेवतो तो हा पाऊस. म्हणुनच कदाचित एखाद्याचे वय सांगताना 'त्याने इतके पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. 'उन्हाळे किंवा हिवाळे' असे नाही म्हणत.. कदाचित म्हणुनच शतकानुशतके त्याचावर इतके काही बोलले गेले, लिहिले गेले तरी हा आपला प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे टवटवीत.. कधीकधी मला तर असे वाटते की पावसाला आपण नकळतपणे मानवाचा दर्जाच देऊन टाकलाय जसा काही.. म्हणजे बघा हं, आपण पावसाची वाट बघतो, तो आला नाही तर रागावतो, एकीकडे तमाम वेधशाळा छातीठोकपणे 'पुढचे दोन तीन दिवस तरी पाऊस काही येणार नाही' असे सांगत असताना, एखाद्या लबाड मुलाप्रमाणे तो अचानक येतो, आणि आला की थांबायचे नाव घेत नाही. तो जोरात कोसळला तरी आपल्याला नकोसे होते व जाताना तर तो अगदी हुरहुर लावून जातो. काही का असेना, तो आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य घटक असतो हे बाकि खरे... जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत तो आपली साथ काही सोडत नाही..

आपल्या जन्मवेळी घरातल्यांच्या तो आनंदाश्रूंच्या रुपात बरसतो. लहानपणी आपल्याला 'पाण्यात होड्या सोड्ण्यातली आणि कानात वार भरलेल्या वासराप्रमाणे चहुबाजूनी फिरण्यातली गम्मत तो शिकवतो. आठवा ती ' ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'सांग सांग भोलानाथ' सारखी गाणी, अवघे बालपण क्षणभर का होइना, परत मिळाल्यासारखे वाटेल. 'खुप पाऊस पडू दे रे देवा, म्हणजे मग शाळेला सुट्टी मिळेल' या प्रार्थनेतला निरागसपणा त्यानेच दिला असतो जसा काही..
तरुणपणी तर काय, आधीच तरल, आतुर झालेल्या मनाला पाऊस चहुबाजुनी खतपाणी घालत असतो. मग ते आवडत्या व्यक्तीला घेऊन पावसात मनसोक्त भिजणे असो वा गरमागरम भजी खात वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत मारलेल्या निवांत गप्पा असोत, किंवा मग एखाद्या दिवशी कामावर मस्तपैकी दांडी मारून घराच्या खिडकित हरवल्यासारखे तासनतास पाऊस बघत उभे रहाणे असो नाहीतर मित्रांबरोबर ट्रेक ला जाणे असो, सगळीकडे पाऊस आपली मूक सोबत करतच असतो...
आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा पाऊस आपल्या डोळ्यात गतकाळच्या आठवणींचे पिसारे फुलवतो. थकलेल्या शरीर वा मनाला नवचैतन्य देतो.. जणू आशावाद देत असतो, 'अरे वेड्या, घाबरू नकोस, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत अंतानंतरही नवा आरंभ आहेच आहे. कारण मी म्हणजेच जीवन, मी म्हणजेच आशा..!! '
बघाना, आत्ता हा लेख लिहितानाही माझ्या मोबाईलवर 'श्रावणात घन नीळा बरसला' हे गाणे सुरु आहे. आणि डोळ्यासमोर साक्षात् श्रावण उभा आहे. तेंव्हा आता थांबलेलेच बरे.
तुम्हा सर्वाना पाऊस अनुभवण्यासाठी शुभेच्छा...!!

Monday, August 8, 2011

Notting Hill.. एक परीकथा !



चित्रपट साधारणतः दोन प्रकारचे असतात. काही अतिशय वास्तवदर्शी असतात तर काही केवळ स्वप्नातच घडू शकतील अशा घटनांचे चित्रण करणारे असतात. मला स्वतःला जसे वास्तवदर्शी चित्रपट पाहायला आवडतात तसेच काही वेळा स्वप्नांच्या राज्यातही रमायला आवडते. का माहित नाही, पण अशा परीकथाही काही वेळा जगण्याची नवीन उमेद देऊन जातात. मन अगदी refresh होते. माझ्या आरामाच्या असंख्य कल्पनेतील खाली दिलेली सर्वात वरच्या क्रमांकाची कल्पना आहे....बाहेर छान पाऊस रिमझिमत असावा, मी माझ्या उबदार घरकुलातील आरामदायी सोफ्यावर निवांतपणे बसून छानश्या जाळीदार खिडकीतून बाहेरचा पाउस व त्यामुळे येणारा गारवा अनुभवत बसावे, एका हातात काहीतरी चटकमटक खायचे व दुसरया हातात चहाचा वाफाळता कप असावा, आणि dvd वर एखाद्या परीकथेत प्रेमाचे गहिरे रंग भारत असावेत... खरच हे चित्र नुसते डोळ्यासमोर आले तरी फार प्रसन्न वाटते. या माझ्या अनुभवाला पूर्णत्व देणाऱ्या ज्या काही परीकथा आहेत त्यामध्ये ' Notting Hill' या चित्रपटाचा क्रमांक खूप वरचा लागतो.

चित्रपट पाहण्याची आणि आवडण्याची कारणे खूप सारी आहेत- बाकी काही आवडत नसले तरी ज्यांना फक्त लंडन हे शहर आवडते त्यांनीही हा चित्रपट जरूर पाहावा. - त्यात मला तर काय, Julia Roberts व Hugh Grant हे दोघेही आवडतात. कोणी म्हणते कि हा चित्रपट Julia Roberts च्या खरया आयुष्यावर आधारित आहे. काही का असेना, आपल्याला मात्र हा चित्रपट एक परीकथा पहिल्याचा आनंद देवून जातो आणि काही क्षणांपुरता का होईना, पण आयुष्य छान आहे, मनात इच्छा असेल तर काहीही घडू शकते, असा विश्वास देतो.

तर William Thacker, हा,(तसा अयशस्वीच म्हणता येईल असा) एक पुस्तकांचे दुकान चालवणारा माणूस! अतिशय अबोल, पण प्रामाणिक आणि सज्जन असा.. (कदाचित म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेलेली असते). तो एका विक्षिप्त (पण मजेशीर) room-mate बरोबर राहत आहे. पण एका बुधवार नंतर त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या दिवशी, लाखात एक अशा योगायोगाने, Anna Scott हि जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या दुकानात पुस्तके घ्यायला येते... त्याच्या साधेपणामुळे प्रभावित होते, नंतर लगेचच एका विचित्र अपघातामुळे ती त्याच्या घरात येऊन पोचते आणि नंतर सुरु होते एक योगायोगांची विलक्षण मालिका..!! आता हि परीकथाच असल्यामुळे शेवट गोड होणार हे ओघाने आलेच, तरीपण julia Roberts व Hugh Grant, यांची पडद्यावरील chemistry अक्षरशः तुफान आहे. त्याला तितकीच मजेशीर साथ आहे ती Rhys Ifans , Tim McInnerny, Gina McKee, Emma Chambers या William च्या धमाल ग्रुपची. अनेक फ्रेम्स मध्ये हि मंडळी स्वतःची छाप सोडतात. काही प्रसंगाची खरी मजा पडद्यावरच घेण्यासारखी... मग तो ' William काही कलाकारांची मुलाखत घेतोय (खोटा पत्रकार बनून) हा प्रसंग असो, किंवा 'Anna William च्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त William बरोबर त्याच्या मित्राकडे जाते हा प्रसंग.. यातील गाणीही अतिशय श्रवणीय आहेत...

एकूण काय, थोडावेळ जर वास्तवाचे भान हरपून स्वप्नांच्या राज्यात रमायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा..

Tuesday, April 12, 2011

एक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... !!

काल सोमवार. आठवड्याचा पहिला आणि बहुतकरून सर्वांना थोडासा नकोसाच वाटणारा दिवस.. पण माझ्यासाठी मात्र खूप खूप चांगला उगवला होता बऱ का ! 
त्याचे झाले काय, की गेल्या वीकेंड ला माझा लाडका, एकुलता एक धाकटा भाऊ माझ्याकडे राहायला आला होता. शनिवार-रविवार मध्ये मी, माझा नवरा, माझा दोन वर्षाचा छकुला व त्याचा मामा अशी चार जणांनी मिळून धमाल केल्यावर सोमवारी मात्र मला माझे लहानपण पुन्हा -एक दिवसासाठी का होईना - अनुभवावेसे वाटले , म्हणून मग नवरा कामावर गेल्यावर आणि अरिन ला day-care मध्ये सोडल्यावर  (ऑफिसला रीतसर सुट्टी टाकून)  मी आणि माझे बंधुराज जे बाहेर पडलो ते गावभर भटकंती करून व झक्कास जेवण करून थेट दुपारीच घरी उगवलो. त्यानंतर , घरातील टेरेस मध्ये तासभर गप्पांचा फड जमवला. काल सुदैवाने हवासुद्धा कुंद, पावसाळी -पण मला अतिशय आवडणारी- अशी होती. मग एकदम माझ्या डोक्यात आले, की अरे, आपल्याला लाडक्या नवरोजीनी गेल्या वाढदिवसाला जो champion board गिफ्ट दिला आहे तो तसाच धूळ खात पडून आहे. मग काय, पुढचा तासभर मस्तपैकी कॅरम खेळून जीव रमवला. सोबतीला अखंड गप्पांचा रतीब चालूच होता. त्यावेळी जाणवले की खरच कितीतरी दिवसांनी आपण असे मोकळेपणानी हसतोय, बडबडतोय... मधली वर्षे जणूकाही गायबच झाली होती आमच्या दोघांसाठी! माझ्या  डोळ्यासमोर  ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर...! माझ्या भावाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. कालच्या एका दिवसाने मला किमान पाच वर्षांनी तरुण केले... !!

माझा हा कालचा अनुभव हा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी , रुटीन मधून बाहेर पडून, एक दिवस तरी निवांत, मनाजोगता घालवण्याची नितांत गरज असते. असं म्हणतात की असा एक दिवस जरी आपण जगलो तरी आयुष्य जवळपास पाच वर्षांनी वाढते. 

नेमकी हीच थीम आहे मी आज ज्याविषयी लिहिणार आहे त्या चित्रपटाची! नाव आहे अर्थातच - एक उनाड दिवस !
विश्वास दाभोळकर एक अतिशय शिस्तप्रिय माणूस. नियमाप्रमाणे अथवा शिस्तीने न वागणारी माणसे त्यांना सहनच होत नाहीत. पण या माणसावर जेंव्हा त्याच्या वाढदिवशीच काही कारणामुळे एक संपूर्ण दिवस बाहेर -रस्त्यावर - व्यतीत करण्याची वेळ येते, तेंव्हा काय होते याचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. सामान्य माणसे, त्यांचे छोटे छोटे आनंद व त्यातूनच त्यांच्या चेहेरयांवर फुललेले निर्व्याज हसू हे सगळे आपल्याही कुठेतरी आत आत भिडते.. पटते.  तसे पाहिले तर अशा क्षणातच आपले आयुष्य सामावले असते की ! म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय? खर की नाही?
अशोक सराफ हे विश्वास दाभोळकर म्हणून अगदी झकास. बाकी सर्वांच्याच अगदी छोट्या भूमिका आहेत. खास उल्लेख करायलाच हवा तो फैयाज यांच्यावर चित्रित केलेल्या 'हुरहूर असते तीच उरी ' या शोभा जोशी यांनी गायलेल्या गजलेचा... ती गजल, ते शब्द, ती चाल सारे काही  एकदम ' hi class' !!

शेवटी एक सांगावेसे वाटते की शांतपणे बसून हा चित्रपट पाहिलात तरी तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटेल...लावता पैज? 

Friday, April 8, 2011

कुंकू .. (सन १९३७)

वाचकहो, 
लेखाचे शीर्षक वाचून तुमच्या चेहरयावर उमटलेले प्रश्नचिन्ह मला स्पष्टपणे दिसते आहे. ' Out of Africa ' नंतर लगेच कुंकू? आणि ते सुद्धा आपल्या आजोबांच्या काळातील? पण माझी खात्री आहे, जर तुमच्यापैकी कोणी हा सिनेमा पहिला असेल तर तुम्हाला या दोघांमधील समान धागा लगेचच उलगडेल. या दोघांचेही एक ठळक वैशिष्टय असे कि हे दोन्ही चित्रपट खरया अर्थाने स्त्री-केंद्रित आहेत. मग भले समस्या निराळ्या का असेनात..!!
      एका वाक्यात सांगायचे तर हा सिनेमा म्हणजे एक नामवंत वकील 'काकासाहेब' आणि त्यांची (मुलगी शोभेल अशी) पत्नी 'नीरा' यांच्यातील खिळवून ठेवणारा संघर्ष आहे. 

नीरेवरील मातापित्यांचे छत्र केंव्हाच हरपले आहे. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण दिले आहे. सुसंस्कृत केले आहे, तसेच स्वतंत्रपणे विचार करायलाही शिकवले आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न नीरा, आपल्या मामा-मामीच्या घरात राहत आहे. त्या घरातील परिस्थिती तिच्या घराच्या अगदी विरुद्ध आहे. मामा मामी घरच्या गरिबीला आणि खंडीभर मुलांना कंटाळलेले आहेत. परिस्थितीवश मामा नीरेचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बरयाच मोठया अशा एका नामवंत वकिलाशी लावून देतो. हे लग्न नीरेला फसवून करण्यात आले आहे. म्हणजे बैठकीला एका तरुण मुलाला बसवून प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी मात्र या बिजवराला उभे करण्यात आले आहे. नीरेला जेंव्हा सत्य परिस्थिती उमगते तेंव्हा सर्वप्रथम ती हे लग्नच नाकारते. पण घरातील कोणीही तिचे काहीएक न ऐकता तिला नवरयाबरोबर त्याच्या गावी रवाना करतात. नीरा त्या गावाला जाते खरी, पण तिथे त्या घरातच ती स्वताचे वेगळे विश्व निर्माण करते. वृद्ध पतीचा मान राखतानाच त्याला शरण जायचे नाकारते. नवर्याच्या कारस्थानी आत्याविरुद्ध बंड पुकारतानाच, तिच्या नातीबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करते. घरातील अडगळीच्या खोलीचे स्वरूप पालटते. त्या खोलीला देवघरचे रूप आणते. काकासाहेबांच्या उद्धट आणि रंगेल मुलाला वठणीवर आणतानाच त्यांच्या बुद्धिमान मुलीचा आदर्श मात्र सतत डोळ्यासमोर ठेवते. शेवटी काय होते ते पडद्यावरच पाहणे योग्य..
चित्रपट, मग तो कोणत्याही काळातील असे ना का, त्याची कथा हाच त्याचा खरा आत्मा असतो, हे हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला नव्याने जाणवते. तसे पाहिले तर हा चित्रपट 'कृष्णधवल' काळातील आहे. तरीपण दमदार कथेच्या आणि सच्या सादरीकरणाच्या शोधात असलेल्या कुणाही रसिकाला रंगांची कमतरता मुळीच जाणवू नये अशीच या चित्रपटाची मांडणी आहे. 
शांता आपटे (नीरा) आणि केशवराव दाते (काकासाहेब) या नामवंत कलाकार मंडळीनी आपापल्या भूमिकांमध्ये आपला जीव ओतला आहे.  त्यातील आशयघन गाणी, प्रभात ची दर्जेदार निर्मितीमूल्ये.. सारेच विचार करायला लावणारे.. आपणा सर्वांसाठी हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देवून जातो - 

' मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वीमोलाची !
तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची, परवा ही कुणाची ?' 


Tuesday, April 5, 2011

'Out of Africa'--- नव्हे 'out of the world ' ......

वाचकहो, 
पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी पाहिलेल्या , आणि अर्थातच मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहिण्याचा मानस आहे. हेतू हा, कि त्या निमित्ताने आपल्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करता येईल व त्याहूनही महत्वाचे म्हणजे, मला तो चित्रपट पुन्हा नव्याने अनुभवता येईल. तर आजचे या मालिकेतले पहिले पुष्प.. अर्थात , ' OUT OF AFRICA....!!

 दिग्दर्शक Sydney Pollack च्या १९८५ साली पडद्यावर आलेल्या या अद्वितीय कलाकृतीला सात वेगवेगळ्या विभागांमध्ये 'academy awards ' ने गौरवण्यात आले होते. मला वाटते कि इतकी माहितीसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करण्यास पुरेशी आहे. तरीपण ..
तर हा चित्रपट Isak Dinesen (टोपणनाव Karen Blixen) या लेखिकेच्या 'out of Africa' या १९३७ साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रावर बेतलेला आहे. आणि तो घडतो साधारण १९१४ ते १९३१ या कालखंडात.
चित्रपट सुरु होतो तो डेन्मार्क मध्ये... वृद्ध कारेन अंथरुणावर खिळली आहे. तरीही तिच्या डोळ्यासमोर तरळत आहे तिने आफ्रिकेत मोंबासा येथे Ngong Hills च्या पायथ्याशी विकत घेतलेले फार्म हाउस ! आफ्रिकेतील वास्तव्याशी निगडीत आहे तो तिच्या आयुष्यातील रुढार्थाने सर्वात अपयशी , पण तरीही तिच्यादृष्टीने सर्वात रोमांचकारी कालखंड ! कारण त्याला Denys Finch Hatton या मुक्तात्म्याच्या प्रेमाची गहिरी झालर लाभली आहे !!
कारेन गोष्ट सांगायला सुरुवात करते.."I had a farm in Africa......" आणि मग सुरु होतो जवळपास अडीच तासांचा प्रवास... कधीही संपू नये असे वाटणारा... 
कारेन ही एक श्रीमंत, उच्चकुलीन अशी डेन्मार्क येथे राहणारी स्त्री. केवळ baroness हे बिरूद लावण्यासाठी ती   bror Blixen नावाच्या एका baron शी लग्न ठरवते. तिचे स्वप्न असते.. आफ्रिकेमधील तिच्या टुमदार फार्म हाउसवर एक डेअरी सुरु करण्याचे. पण लग्न करण्यासाठी जेंव्हा ती आफ्रिकेत पोचते, तेंव्हा तिच्या लक्षात येते कि तिच्या सुनियोजित वराने त्या जागेचा वापर कॉफीची लागवड करण्याकरता करायचे ठरविले आहे; नव्हे तशी तयारीही सुरु केली आहे ! संघर्षाची पहिली ठिणगी इथेच पडते.  लग्नाच्या दुसरयाच दिवशी कारेनला एकटीला टाकून तिचा नवरा दूर शिकारीला निघून जातो.. तिला मनस्वी यातना होतात. पण ती आहे त्या परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज होते. कॉफी लागवडीच्या कामात जातीने लक्ष घालते. तिथल्या स्थानिक कामगारांची मने आपल्या वागणुकीने जिंकते. त्यांच्यासाठी पुरेसा रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करते. त्या कुकुयू जमातीच्या आदिवासींच्या मुलांनी शाळेत यावे म्हणून जंग-जंग पछाडते. या सगळ्यामध्ये तिला आधार मिळतो तो Denys Finch Hatton या उमद्या व्यक्तिमत्वाचा.. तो तिला एक स्त्री म्हणून न वागवता एक माणूस, एक व्यक्ती म्हणून सन्मानाने वागवतो. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. तिला खऱ्या अर्थाने मुक्तपणे जगायला शिकवतो. कारेन त्याच्यामध्ये पूर्ण गुंतत जाते.. पण सरतेशेवटी तिचे दुर्दैव तिच्या इच्छाशक्तीवर मात करते.. 

आता चित्रपटाची पूर्ण स्टोरी सांगायची म्हटली तर एवढीच... पण त्यातील अतिशय तलम कशिदाकारी हि फक्त पडद्यावरच पाहण्यासारखी... खरे तर हा चित्रपट नुसता पाहण्याचा नाहीच. तर ती पंचेद्रीयानी अनुभवण्याची गोष्ट आहे.. चित्रपटातील सिंहांची शिकार, हत्तींचे चित्कार, रातकिड्यांची किरकिर, कानांना तृप्त करणारी मोझार्ट ची symphony, तो आफ्रिकेतील वेळीअवेळी कोसळणारा पाउस, हे सगळे शब्दात पकडणे केवळ अशक्य.. 
चित्रपटातील कालखंड साधारण पहिल्या महायुद्धाच्या आसपासचा. त्यामुळे, त्याकाळी स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक पाहता, कारेनचा संघर्ष आणखीनच उठून दिसतो. 
चित्रपटाच्या अनेक plus points पैकी प्रामुख्याने काही सांगायचे म्हटले तर त्यातील कलाकारांची फौज! Meryl Streep ही गुणी अभिनेत्री 'कारेन ' अक्षरशा जगली आहे. तीच गोष्ट Robert Redford याची. या दोन दिग्गजान्विषयी मी काही लिहावे इतकी माझी पात्रता नाही... दुसरे म्हणजे या चित्रपटाची cinematography.. 
ती फक्त अनुभवायची! जगायची !!
काय, आता इतके सांगितल्यावर वाटतोय न हा चित्रपट पाहण्यासारखा? मी तरी लिहिता लिहिताच पुन्हा एकदा तो जगले... विश्वास ठेवा, चित्रपट पाहिल्यावर खूप वेळ रेंगाळत राहील तो मनात...!!!

टीप - वरील व्यक्त केलेली मते हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत.. त्याची कृपया चित्रपटाच्या समीक्षेशी गल्लत करू नये ही विनंती. 

Monday, April 4, 2011

सृजनाची ही असे घडी, चला उभारू उंच गुढी...!!





तो फुलांनी गच्च बहरलेला गुलमोहोर, ती कोकीळा, तो अशोकवृक्ष, ती आंबा व कडुनिंबाची कोवळी पालवी, तो मोगऱ्याचा गंध काय बरे सांगत आहेत? ती सकाळची प्रफुल्लीत सूर्यकिरणे कोणाचे स्वागत करीत आहेत ? 
कालपर्यंत सोबतीला असलेली मनावरची मरगळ अचानक कुणी निपटून काढली आहे? ही त्या चैत्राची किमया तर नव्हे? मग प्रवीण दवणे म्हणतात तशी खरच ही 'चैत्रपालवी' नव्हे तर ' मैत्रापालवी' आहे... शांताबाई शेळके यांनी या रुतूराजाचे स्वागत किती समर्पकपणे केले आहे..
गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला.. !!

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
नूतन वर्षाभिनंदन.....!!!



Monday, February 21, 2011

गंध !.. उदबत्तिचा, औषधांचा आणि तान्हुल्या जीवाचाही...!!!

नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की, स्वारीने कालच हा सिनेमा पाहिलेला दिसतोय. 
तर गंध.. काय बरं फरक आहे वास आणि गंध यात? मला वाटते की वासाला आठवणी चिकटल्या की तो गंध होतो. 
ह्या पिक्चरचेच पाहा ना, तीन निरनिराळी  कथानके, पात्रांचे जगण्याचे मापदंडही वेगळे, तरीही या सर्वांना जोडणारा एक common धागा..अर्थात गंध !
पहिली गोष्ट एका उपवर लग्नेच्छु तरुणीची. घरचे 'लग्न कर' म्हणून मागे लागलेले , स्थळही सांगून येतायत आणि अशातच तिला भेटतो एक साधासा तरुण  ज्याच्या शरीरगंधावर ती मोहित होते. पुढे त्याचा पाठलाग करत असताना तिला कळते की तो रात्री एका उदबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात काम करत असतो. नंतर काय होते हे सुज्ञास  सांगणे न लगे... पण तरीही.. या कथेचा सुखांत होतो!!  खरेतर ही कथा फार वेगळी नाही. काही वेळा तर  अमृता सुभाषच्या थोड्याश्या नाटकी अभिनयाचा वैतागही येतो. तरीपण कथेची मांडणी, camera ने पकडलेल्या ओळखीच्या तरीही वेगळ्या अशा पुण्यातल्या गल्ल्या आणि गिरीश कुलकर्णीचा संयत अभिनय या गोष्टी आपल्याला नक्कीच खिळवून ठेवतात. 
          माझ्यामते तरी हा सिनेमा  उरलेल्या दोन कथांमध्ये जबरदस्त पकड घेतो. एक गोष्ट म्हणजे 'औषध घेणारा माणूस' आणि दुसरी ' बाजूला बसलेली बाई'. त्यापैकी 'औषध घेणारा माणूस' ही गोष्ट आहे एका 'HIV positive ' माणसाची ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे व काही काळाने त्याला परत भेटायला आली आहे. त्या दोघानमधिल अजूनही शिल्लक असलेल्या प्रेमाचे रंग सोनाली कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी अतिशय हळुवारपणे साकारले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही पण मिलिंद सोमण हा ही किती गुणी कलाकार आहे हे वेळोवेळी  जाणवते. खास उल्लेख करायला हवा तो त्याच्या शुद्ध मराठी उच्चारांचा.. [ हो कारण बरीचशी मराठी models , मराठी अगदी नवीन शिकत असल्यासारखे बोलतात.] 
                   हा 'HIV positive ' माणूस फक्त औषधांवर जगतोय, पण त्याची पत्नी त्याला ज्यावेळी सोडून गेली त्या क्षणापासून त्याने ते घर जसे च्या तसे ठेवले आहे.. तिची आठवण म्हणून! ती खूप दिवसांनी घरी येणार ह्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने मनात अगणित योजना तयार केल्या आहेत. खास तिच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला आहे. पण तिला मात्र आल्यापासून कसला तरी सडलेला दर्प येतो आहे घरात आणि मग हळूहळू त्या दोघांना (आणि आपल्यालाही) असे जाणवते की हा माणूस वास घ्यायची शक्तीच गमावून बसलाय. अगदी कांदा किंवा लिंबू अशासारखे तीव्र वासही त्याला जाणवत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून तो gas चे  बटण  लावतो व बर्नर च्या अगदी जवळ जाऊन तो वास घ्यायचा प्रयत्न करतो... कितीतरी वेळ... याचा शेवट दिग्दर्शकाने जसा काही तुमच्यावर सोडला आहे...अगदी कालवाकालव होते त्यावेळी... 
         तिसरी गोष्ट आहे तळकोकणातल्या अशा एका घराची ज्यामध्ये एक माहेरवाशीण बाळंत होत आहे आणि त्या घरातील कर्ती बाई 'बाजूला' बसली आहे. तिचा नवरा बाहेरगावी गेला आहे. या सगळ्या वातावरणाला पार्श्वभूमी आहे ती मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेची. एकीकडे या बाईची सासू मुलीचे बाळंतपण पार पाडताना मेटाकुटीला आली आहे तर दुसरीकडे या 'बाजूला' बसलेल्या बाईचीही तगमग होत आहे... दोन कारणांमुळे, एक म्हणजे घरातील घडामोडी व दुसरे म्हणजे तिची स्वतःची कूस अजून रिकामीच आहे.. या सर्व काळामध्ये तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा भाचा राघव! या दोघांमधील संवाद, त्याच्यामधील राघूचा निरागसपणा, नीना कुलकर्णीच्या डोळ्यामधील भाव [हो, सांगायचे राहिलेच, ही बाजूला बसलेली बाई  नीना कुलकर्णीने रंगवली आहे .]  यातील काहीही miss करून चालणार नाही. शेवटी चौथा दिवस उजाडल्यानंतर कसेबसे सर्व आवरून ही बाई जेव्हा त्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्या जावळाचा, त्याच्या अंगाचा श्वास भरून गंध घेते तेव्हाची तिची भावमुद्रा आपल्या मनात कायमचे घर करते. 
      ही गोष्ट घडत असताना दिग्दर्शकाने (किंवा कैमेरामन ने म्हणूया हवे तर) तळकोकणाचे असे काही भुलवणारे रूप दाखवले आहे की निव्वळ त्याच्यासाठी ह्या सिनेमाला १०० पैकी २०० मार्क्स द्यावेत. एडिटिंग ची सुद्धा हीच गोष्ट आहे... 
एकूण काय, सचिन कुंडलकर यानी त्यांच्या ठेवणीतून पेश केलेल्या या अत्तराच्या कुपीचा गंध आपल्या मनात दीर्घकाळ रुंजी घालतो हे नक्की...!!

          

Monday, February 14, 2011

Happy Valentines Day.. To all human beings!!


प्रेम..नुसत्या उच्चारानिशी अंगावर रोमांच फुलवणारा जादुई शब्द ! 
व्यक्ती बदलली की प्रेमाचे संदर्भही बदलतात. कोणासाठी मातृप्रेम  हे सर्वश्रेष्ठ तर कोणासाठी देशप्रेम . कोणाला सत्तेचे प्रेम आंधळे  बनवते तर कोणाला पैशाचे प्रेम... कोणी दर दिवसाला बदलणारी गर्लफ्रेंड हीच प्रेमाचीअभिव्यक्ती मानतो तर दुसरीकडे 'जिच्यावर मनापासून प्रेम केले अश्या प्रेमिकेचा दुर्दैवी अंत झाल्यावर तिच्या आठवणीवर  उरलेले आयुष्य काढणारा प्रेमिकही आपल्याला भेटतो. पण एक मात्र नक्की, आपण सगळे  'प्रेम' या संकल्पनेवरच  मनापासून प्रेम करत असतो.
त्यातून आज तर काय, जगभरातील 'प्रियकर-प्रेयसीला' त्यांच्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करायचे license  देणारा दिवस.. जिकडे पाहावे तिकडे कसे गुलाबी वातावरण तयार झाले आहे. सगळ्या सार्वजनिक बागा आणि जागा  तरुणाईने  भरून आणि बहरून गेल्या आहेत. ' I LOVE YOU'  किंवा 'मी तुझी साथ जन्मभर सोडणार नाही' अशा आणाभाका चोहिकडे ऐकू येत आहेत. (त्यातल्या किती निभावल्या जातात त्याचे संशोधन करायला वेळ कुणाला आहे इकडे? ).  बरयाच विवाहोत्सुक जोड्यांनी लग्नबंधनात अडकण्यासाठी आजचाच पवित्र(?) मुहूर्त निवडलाय. dinner ला कोठे जायचे, आपल्या प्रिय व्यक्तीला भेट काय द्यायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले आहे. एखाद्याच्या मनात जर गिफ्ट विषयी confusion असेलच चुकून, तर मोठमोठे shops आहेत की सज्ज तुमची ही छोटीशी समस्या दूर करायला.. हा खिसा तेवढा जड़ असला की झाले..  
वरील सर्व वाचून 'हिला प्रेमाची allergy आहे का ' असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू का, मला allergy ही प्रेमाविषयी नसून प्रेम साजरे करण्याच्या प्रकाराबद्दल आहे. इतक्या हळुवार, नाजूक भावनेचे जाहीर प्रदर्शन करण्याची खरोखरीच किती गरज आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत ही भावना पोचली की पुरेसे नाही का? आणि गिफ्ट चे म्हणाल तर तुमचे शाश्वत प्रेम हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे गिफ्ट नाही का? म्हणजे काहीच गिफ्ट देऊ नका असे नाही.. पण केवळ  त्याच्या  किमतीवरून तुमच्या प्रेमाची खोली नाही ना मोजली जाऊ शकत...तेव्हा गिफ्ट देताना त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार सर्वात आधी..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'partner' खेरीज इतरही माणसे आहेत हो आपल्या जीवाभावाचीज्यांनी स्वतःच्या असंख्य इच्छा-आकांक्षा बाजूला सारून तुम्हाला परिस्थितीची जाणीव न करू देता वाढवले ते आई-बाबा,ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःला मिळालेल्या chocolate चा अर्धा तुकडा राखून ठेवला ती तुमची भावंडे, ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात साथ दिली ते तुमचे शेजारी, तुम्हाला शिकवलेले शिक्षक.. फार गरज आहे हो यासगळ्यांना तुमच्या प्रेमाची.... तुम्ही ते करत नसाल असे नाही, पण त्याची कबुली त्या व्यक्तीकडे देऊन तर बघा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खूप काही देऊन जातील तुम्हाला.. आपले आयुष्य ज्यांनी ज्यांनी सुंदर केले त्यांनाआपण बाकी काही देऊ शकत नसलो तरी त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, कृतदन्यता व्यक्त करण्यासाठी या दिवसासारखा दुसरा दिवस नाही असे मला तरी वाटते. 
तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून 'Happy Valentines Day....!!!'

Monday, January 31, 2011

दिल तो बच्चा है जी..

आजचीच गोष्ट. छान आरामात घालवलेल्या शनिवार-रविवार या जोडगोळीनंतर  आलेला उदासवाणा सोमवार. बरयाच वेळा मला तरी सोमवारी ऑफिसला बुट्टीच मारावी असा विचार मनात येउन जातो. पण काय करणार? मज़बूरी, दुसरे काय ! त्यातून आज महिना अखेर. अस्मादिकांच्या बचत खात्यात थोडेसे जास्तीचे पैसे जमा असतील (पगाराचे हो, दुसरे कुठले?) असा विचार करून स्वारी सर्व काही वेळेवर आवरून, पिल्लाला डे-केयर मध्ये सोडून खुशीत मोबाइल वर गाणी ऐकत ऑफिसला जायला निघाली. मी सहसा बसने प्रवास करते. पैशाची बचत, चार अनुभव गाठीशी बांधता येतात वगैरे वगैरे... (पुण्यातले ट्राफिक पाहता खरा विचार हा असतो की  ड्राईवरने बस कशीही चालवली तरी काही विपरीत झाल्यास बसचे [व पर्यायाने आपले] सर्वात कमी नुकसान होईल.) पण आज शेयर-मारुती येताना दिसली, म्हटले चला जाउन बघूया. त्या मारुती वाल्याचा चेहरा अगदी श्रीरामांच्या जवळपासचा दिसत होता  म्हटल्यावर माझी हिम्मत आणखिन वाढली. 
   आत बसले मात्र, त्याने आपले खरे स्वरुप सर्व प्रवाशाना दाखवायला सुरुवात केली. गाडी नावाप्रमाणेच मारुती असावी की काय अशा वेगाने तो ती चालवत (की उडवत) होता. ह्या स्वर्गलोकिच्या वाहनासमोर 'speed-breaker' किंवा रस्त्यावरील इतर वाहने अशा क्षुद्र गोष्टींची काय पत्रास हो? त्यात भरिस भर म्हणून ती 'share-vehicle special' ढिंचाक गाणी! मी तत्परतेने माझ्या सेल वरची गाणी बंद करून टाकली. उगाच आपल्या  सेलची battery कशाला डाउन करा? (असे सुविचार पुण्यात शिफ्ट झाल्यापासून सुचतायत बर का !!). आणि सह्प्रवाश्यांच्या चेहेरयावरिल भीती, चिंता, कुतूहल, राग अशा भावनांचे मिश्रण वाचत बसले होते.  
अचानक गाडीत चाललेला तो वाद्यांचा कलकलाट बंद झाला आणि राहत फतेह अली खान चे हळुवार स्वर कानावर येऊ लागले....'दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी...' त्या एकंदर माहौलाशी ते वरवर इतके विसंगत वाटत होते तरीही त्या सुरात अशी काही जादू होती की मन खरच एखाद्या लहान मुलासारखे टुणकन उडी मारून गाडीच्या बाहेर पळाले. पतिराजांबरोबर छानसा पिक्चर बघून व मस्त dinner घेउन आले. बछडयाबरोबर धमाल दंगामस्ती करून आले. माझ्या आवडीचे छानसे पुस्तक वाचून आले. तसेच माहेरी जाउन आईच्या उबदार कुशीत शिरून आले. आजीशी पत्ते खेळून आले. कितीतरी गतकाळातले क्षण पुन्हा नव्याने जगून आले. अनेक नात्यांच्या रेशीमगाठी नव्याने विणून आले..
' madam, उतरा की आता. दहा रुपयात आणखी किती पुढे जाणार?? ' .. गाडिवाल्याच्या प्रेमळ दटावणीने माझी तंद्री भंगली. त्याला दहा रुपये देताना मी मनात म्हटले 
' मित्रा, इथे पुढे कोणाला जायचे आहे? दहा रुपयात तू मला कितीतरी मागे नेऊन आणलेस तेच
 आजचा दिवस तरी पुरेल..!!'

Monday, January 24, 2011

असा गन्धर्व पुन्हा न होणे..!!

भीमसेन जोशींचे निधन.. ऑफिस मध्ये आल्या आल्या 'सकाळ' वर ही बातमी वाचली.
खूप धक्का बसला वगैरे म्हणता येणार नाही. कारण गेले काही दिवस त्यांच्या तब्येती विषयी काहीबाही ऐकायला येतच होते. आणि एकंदरीत  त्यांचे वय पाहता  मनाला पुढील अशुभाची चाहुल लागली होती. पण म्हणतात ना, आनंदाच्या झाडाची कितीही फुले तोड़ता आली तरी 'आणखिन हवे' चा पुकारा मन काही थाम्बवत नाही. तसेच पंडित भीमसेन जोशींचे गाणे.. कितीही ऐका, दरवेळी नवा सुगंध येतो त्यातून. जिवंतपणी समाधिचा अनुभव घ्यायचा असेल तर पंडितजींच्या गाण्यासारखे दुसरे साधन नाही.. या गारुडातून कोणाचीही सुटका झाली नाही. मग तो अगदी एखादा सुपरस्टार असो किंवा एखादा 'माउलीच्या भेटीला' निघालेला वारकरी .. त्यांच्या अलौकिक स्वरानी जेथे साक्षात् पंढरीच्या विठोबाला भारुन टाकले तिथे तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानवांची काय कथा हो? 
       माझी खात्री आहे, आता आकाशातले तमाम देवदेवता आनंदात असतील... इतकी वर्षे या गंधर्वाला भूलोकिवर पाठवल्यामुळे रिकामा झालेला त्यांचा दरबार आता भरला असेल. पण ही पृथ्वीवरची मैफल संपली त्याचे काय? 
      असा निराश विचार मनात आला, पण तितक्यातच असे वाटले की अरे, पंडितजींनी आपल्या सर्वाना सुरांचा जो अमूल्य ठेवा दिला आहे तो एक नाही तर सात जन्म पुरणारा आहे मग काळजी कशाला? 


   

  

Monday, January 17, 2011

श्रावणात घन निळा बरसला....

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की या गुलाबी  थंडीत हिला श्रावण कुठे आठवतोय? पण त्याला निमित्तही तसेच झाले.
             तर झाले असे की माझ्या प्रेमळ, उदार, बहुगुणी (वगैरे वगैरे..) नवरयाने आमच्या नविन घराला शोभेल असे SONY चे चकाचक 'HOME THEATRE' खरेदी केले आहे. तसा माझा नवरा (आणि आता माझा दिड वर्षाचा बछड़ा देखिल ) संगीताचा दर्दी ! अर्थात माझीही आवड साधारण त्याच्यासारखीच  आहे म्हणा. तर काल खूप दिवसानी थोडा निवांतपणा होता म्हणून छान गाणी ऐकत बसलो होतो. CD play होत होती. आणि मध्येच कधीतरी हे गाणे सुरु झाले... ऐकता ऐकता डोळ्यासमोर साक्षात श्रावण उभा राहात होता. मन एकदम माहेरीच पळाले आणि ओटीवरील झोपाळ्यावर झोके घेऊ लागले..
     
       माझ्या माहेरी सर्व सणवार अगदी यथासांग पार पाडले जातात आणि त्यातही श्रावणाची मजा काही खासच. सुरुवात होते ती दीवली आमवास्येपासून. [त्याला 'गटारी अमावस्या' असे म्हटलेले मला तरी नाही आवडत बाबा]. ते तबकातले पुरणाचे खरपूस दिवे ज्यानी खाल्ले आहेत त्याना मी का असे म्हणते ते कळेल.
     मग आमचे आवडते काम म्हणजे 'जिवतिचा कागद' देवघरातील भिंतीवर लावणे! त्यातले 'नर्सोबाचे (नरसिन्हाचे) चित्र हे इतके जिवंत रेखाटले गेले आहे की मला अजूनही त्याची भीती वाटते. मग येणारे श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार, श्रावणी सोमवार , श्रावणी मंगळवार वगैरे नेहेमीचेच -पण नावामागे 'श्रावण' लावल्यामुळे एकदम special झालेले- यशस्वी कलाकार. आणि त्याबरोबरच आईची ब्राह्मण -सवाष्ण जेऊ घालण्यासाठी चाललेली तयारी. आम्ही खुश, कारण पुरणपोळी, उकडीचे मोदक, भरड्याचे वडे, नारळीभात, ओल्या नारळाच्या करंज्या, खांडवी अश्या पक्वानांची घरी अगदी रेलचेल असायची. त्याचबरोबर ,विशेष करून शनिवारच्या दिवसभराच्या उपवासानंतर गरमागरम कोळ-खिचड़ी, त्यावर साजुक तुपाची धार व बरोबर लाल माठाची भाजी ही खरोखर आत्मा व रसना दोन्ही एकदमच संतुष्ट करून जायची. तिन्हीसांजा झालेल्या, बाहेर रिमझिम पाउस पडतोय, देवांपाशी मंद नंदादीप तेवतोय, उदबत्तिच्या गंधाने पूर्ण घर भरून आणि भारुन गेले आहे ,अशा  वातावरणातली ती गरमागरम खिचड़ी नुसती आठवली तरी जीव नुसता गलबलून जातो.. 
  
आमचे ग्रामदैवत रामेश्वर! श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार पासून ते दुसरया सोमवार पर्यंतचे सात दिवस देवळात 'सप्ता ' असतो. सतत वेगवेगळी भजनी मंडळे देवासमोर छान छान भजने सादर करतात. तो झांजांचा मंजुळ आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो कधीकधी.. तो दारात अवचित उगवलेला तेरडा, टाकळा, रुईची पाने, त्या मंगलागौरीसाठीच्या तर्हेतर्हेच्या वनस्पती, तो केवड़ा, तो मध्यरात्रि साजरा होणारा कृष्णजन्म, ती दही-पोहे व लोणी-साखरेची वाटी, नागाला वाहिलेले नागाणे-फुटाणे... सगळ्या आठवणींचे छानसे इंद्रधनुष्य होउन मनाभोवती फेर धरायला लागते आणि 'श्रावणात घन निळा बरसला....' हे गाणे त्याच्या अर्थासाहित उलगडायला लागते..!!
खरच, श्रावण हा मराठी महिन्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे ते उगीच नाही काही ..
अशीच मला आवडलेली श्रावणाची एक net वरून मिळालेली कविता व छबी खाली जोडत आहे.. 





Friday, January 14, 2011

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!








चला ,ह्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घराप्रमाणेच आपली मनेही साफ़ करुया.  
एकमेकाना माफ़ करुया. ! प्रतिद्या करुया की आपण सारे - 
 नव्या ओळखी करून घेऊ . जुने सम्बन्ध वृद्धिंगत करु. नातेवाइकान्बरोबरच आपण ज्यांच्यावर खरया अर्थाने अवलंबून असतो तया मोलकरीण, ड्राइवर अशा लोकानाही स्नेहाचे वाण देऊ. त्यांच्या कष्टाचा सन्मान करू. आजारी लोकांची प्रेमाने (किमान फोनवरून तरी ) विचारपूस करू. आपल्या लहानग्याना जवळ बसवून मायेने त्यांचे लाड करू. त्याना ढीगभर खेळण्यांबरोबरच आपला थोडासा वेळही देऊ.  सर्वानी मिळून तोंड गोड करू. आणि आपले आयुष्य, जगणे सुन्दर करू...
          तुम्हा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
       
 तीळगूळ घ्या गोड गोड बोला..





Monday, January 10, 2011

My Name is Khan.. च्या निमित्ताने ..!!

कालच NDTV Imagine ला हा पिक्चर लागला होता. बाकि काही विशेष करण्यासारखे नव्हते म्हणून म्हटल चला बघून टाकू. 
पिक्चर पाहिला आणि का कोण जाणे, खूप अस्वस्थता दाटून आली मनात. तसे पाह्यला गेले तर typical  'करण जोहर'  छाप असलेला आणि ९/११ च्या हल्ल्याची पार्श्वभूमी वापरून, प्रेक्षकाना अमेरिका दर्शन घडवलेला एक सामान्य चित्रपट असेही त्याचे वर्णन होऊ शकेल. याहून सर्वदृष्टिनी कितीतरी सरस चित्रपट मी यापूर्वी कितिदातरी पाहिले आहेत, तरीपण मग ही अस्वस्थता कसली? 
विचार करत गेले तसे तसे जाणवत गेले की ही बेचैनी होती माझ्या छोट्या पिल्लासाठीची जो यावर्षी pre-school मध्ये जाईल.  मग त्याचे मित्र, त्यांचे आपल्यादृष्टिने  अतिशय क्षुल्लक पण त्यांच्याकरिता खूप महत्वाचे असे इगो problems, त्यातून उद्भवणारे मतभेद आणि शेवटी त्याचे मारामारीत होणारे पर्यवसन, हे सगळे चित्र  डोळ्यासमोर तरळले व जीव अगदी घाबराघुबरा झाला. मनात आले, आईवडील रात्र-रात्र जागून ज्या चिमण्या जीवाचे रक्षण करतात,त्याच्याभोवतीच आपल्या आयुष्याचे तलम वस्त्र
 विणतात, त्या तान्हुल्या जीवाची किम्मत कोणाच्यातरी ego पेक्षाही कमी? हा ego निर्माण तरी
 कसा होतो आणि तो जोपसतो तरी कोण? आणि हे मारामारी करणारेही कोणाचा तरी मुलगा/मुलगी असतातच ना? म्हणजे पर्यायाने समाजाचा एक घटक म्हणून आपणही अशा घटना घडण्यास  अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही काय? 
      विचार खोल खोल जात होते. मनाचा तळ ढवळून काढत होते. वाटले की 'आपण एका ठराविक जाती/धर्मात जन्माला आलो यात आपला दोष किंवा कर्तृत्व ते काय?.' खर तर जात ही जन्माने नाही तर कर्माने ठरायला हवी. आणि ह्या संदर्भात ह्या पिक्चर मध्ये झरीना वहाब च्या तोंडी एक मार्मिक वाक्य आहे. ती मुलाला म्हणते की माणसांच्या फक्त दोनच जाती- एक चांगली माणसे आणि दुसरी वाईट. माझ्या पाहण्यात असे एक भटजी आहेत की जे दररोज पौरोहित्य करतात पण त्यानी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्याचवेळी माझा एक मुस्लिम मित्र मात्र स्वताला मुलबाळ नसतानाही , 'सबका मालिक एक ' म्हणत दुसरयाना मदत करायला एका पायावर तयार.. आता तुम्हीच सांगा, कोणाचा धर्मं कोणता? 


या नविन वर्षात बाकी काही संकल्प नाही केले तरी ' माणसाला प्रथम फक्त माणूस म्हणून पाहायचा ' संकल्प सोडायला आणि तो तडीस नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आहात का माझ्या बरोबर??

Tuesday, January 4, 2011

छान छान बडबडगीते... माझ्या छकुल्यासाठी


असे म्हणतात की जात्यावर बसल्यावर आपोआप ओव्या सुचतात, त्यात भर टाकून मी म्हणेन की आई झाल्यावर आपसूकच आपल्यातला कलाकार (की नकलाकार)जागृत होतो. 
                 माझा मुलगा अरिन आता जवळपास दोन वर्षाचा आहे. तो जन्मल्यापासून माझ्या स्वरचित (स्व-रचित, हो, उगाच माझा आणि स्वरांचा काही घनिष्ट सम्बन्ध आहे असा गैरसमज नको व्हायला !!) बडबडगीतांची cassette ऐकतच वाढलाय. त्याच्या ख़ास पसंतीची ही काही गाणी...


१) हत्तुल्या
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा फ्रेंड ?
     देईन मी तुला cashew almond
      हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा यार?
  देईन मी तुला ग्लुको बिस्किटे चार
     हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा दोस्त?
    देईन मी तुला चीकू केळी  मस्त 
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू येशील का माझ्या घरी?
 देईन मी तुला रगडा-पाणीपुरी
हत्तुल्या रे हत्तुल्या आपण भाऊ-भाऊ 
दोघे मिळून लांब लांब फिरायला जाऊ..


२) आमचा अरिन म्हणजे छोटी मनिमाऊ
  सारखा सारखा त्याला हवा खाऊ..
    नकटुले नाक त्याचे मोठे मोठे डोळे 
  गोबरे गोबरे गाल आणि केस कुरळे कुरळे 
सारखा सारखा त्याला किती पाहू ग..
 खेळायला सवंगडी झाले बघा  गोळा
बघता बघता किती हा जमला गोतावळा
मित्र मैत्रीण त्याचे भूभू काऊ चिऊ ग..


                     

काही दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या नविन घरात शिफ्ट झालो. या घराच्या एका टेरेस मधून सूर्योदय दिसतो तर दुसरया टेरेस मधुन सूर्यास्त.. तेंव्हापासून रोज सकाळी एकदा अरिनच्या बाबाना टाटा केला की अरिन आणि मी टेरेस मध्ये जातो व सूर्योदय बघतो. अरिन ची सूर्यबाप्पाशी चांगलीच गट्टी जमली  आहे. त्यावरचे माझे हे latest बडबडगीत...


३) सूर्यबाप्पा..


सूर्यबाप्पा सूर्यबाप्पा उठलात का?
ढगांची चादर काढता का?
आकाशात छान-छान दिसता का?
थंडी आमची पळवता का !
आईने गोड गोड चहा केलाय
त्याच्यात थोड़े आले टाकलय
गरम गरम चहा तुम्ही पिणार का?


प्रचलित गाण्यांची विडंबने तर असंख्य केली आहेत पण त्याविषयी पुढील लेखात... 
आणि हो, एक राहिलेच,  
तुम्हा सर्वाना  नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.. !!

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...