Tuesday, August 16, 2011

पाऊस .. आठवणींचा मोरपिसारा..!

वाचकहो,
आज थोडा ब्रेक घेऊन पावसाविषयी लिहावेसे वाटत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
सकाळी कामावर निघाल्यापासून पावसाची रिपरिप चालू झाली होती, तरीही छत्री न घेताच बाहेर पडले. सुदैवाने, खूप भिजले नाही, आणि तरीही बऱ्याच दिवसांपासून मनात धरून ठेवलेली इच्छा पूर्ण झाली - पाऊस अनुभवण्याची! रमत गमत येताना मनात पावसाचीच अनेक रूपे फेर धरत होती. तशातच मला मी काही महिन्यांपूर्वी 'मनोगत' वर टाकलेल्या पोस्टची आठवण झाली. मग वाटले, कि आपली पावसाविषयीची भावना तुम्हा सर्वांपर्यंत का पोचवू नये? वाचून पहा तर, तुम्हीही लेखातल्या कोणत्या ना कोणत्या भागाशी स्वतःला relate कराल अशी मला आशा, नव्हे खात्रीच आहे....

तर पाउस -
हा फक्त एक शब्द नाही. हे एक गारूड आहे. मधमाश्यांचे असे पोळे की ज्याला एक छोटासा दगड चुकून जरी लागला तरी त्यातून अनंत आठवणीचे मोहोळ उठते.
या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असंख्य माणसे व प्रत्येकाचे आपले असे वेगळे विश्व! पण तरीही सर्वांना एका नाजूक धाग्याने बांधून ठेवतो तो हा पाऊस. म्हणुनच कदाचित एखाद्याचे वय सांगताना 'त्याने इतके पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. 'उन्हाळे किंवा हिवाळे' असे नाही म्हणत.. कदाचित म्हणुनच शतकानुशतके त्याचावर इतके काही बोलले गेले, लिहिले गेले तरी हा आपला प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे टवटवीत.. कधीकधी मला तर असे वाटते की पावसाला आपण नकळतपणे मानवाचा दर्जाच देऊन टाकलाय जसा काही.. म्हणजे बघा हं, आपण पावसाची वाट बघतो, तो आला नाही तर रागावतो, एकीकडे तमाम वेधशाळा छातीठोकपणे 'पुढचे दोन तीन दिवस तरी पाऊस काही येणार नाही' असे सांगत असताना, एखाद्या लबाड मुलाप्रमाणे तो अचानक येतो, आणि आला की थांबायचे नाव घेत नाही. तो जोरात कोसळला तरी आपल्याला नकोसे होते व जाताना तर तो अगदी हुरहुर लावून जातो. काही का असेना, तो आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य घटक असतो हे बाकि खरे... जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत तो आपली साथ काही सोडत नाही..

आपल्या जन्मवेळी घरातल्यांच्या तो आनंदाश्रूंच्या रुपात बरसतो. लहानपणी आपल्याला 'पाण्यात होड्या सोड्ण्यातली आणि कानात वार भरलेल्या वासराप्रमाणे चहुबाजूनी फिरण्यातली गम्मत तो शिकवतो. आठवा ती ' ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'सांग सांग भोलानाथ' सारखी गाणी, अवघे बालपण क्षणभर का होइना, परत मिळाल्यासारखे वाटेल. 'खुप पाऊस पडू दे रे देवा, म्हणजे मग शाळेला सुट्टी मिळेल' या प्रार्थनेतला निरागसपणा त्यानेच दिला असतो जसा काही..
तरुणपणी तर काय, आधीच तरल, आतुर झालेल्या मनाला पाऊस चहुबाजुनी खतपाणी घालत असतो. मग ते आवडत्या व्यक्तीला घेऊन पावसात मनसोक्त भिजणे असो वा गरमागरम भजी खात वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत मारलेल्या निवांत गप्पा असोत, किंवा मग एखाद्या दिवशी कामावर मस्तपैकी दांडी मारून घराच्या खिडकित हरवल्यासारखे तासनतास पाऊस बघत उभे रहाणे असो नाहीतर मित्रांबरोबर ट्रेक ला जाणे असो, सगळीकडे पाऊस आपली मूक सोबत करतच असतो...
आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा पाऊस आपल्या डोळ्यात गतकाळच्या आठवणींचे पिसारे फुलवतो. थकलेल्या शरीर वा मनाला नवचैतन्य देतो.. जणू आशावाद देत असतो, 'अरे वेड्या, घाबरू नकोस, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत अंतानंतरही नवा आरंभ आहेच आहे. कारण मी म्हणजेच जीवन, मी म्हणजेच आशा..!! '
बघाना, आत्ता हा लेख लिहितानाही माझ्या मोबाईलवर 'श्रावणात घन नीळा बरसला' हे गाणे सुरु आहे. आणि डोळ्यासमोर साक्षात् श्रावण उभा आहे. तेंव्हा आता थांबलेलेच बरे.
तुम्हा सर्वाना पाऊस अनुभवण्यासाठी शुभेच्छा...!!

1 comment:

  1. पाऊस तर केव्हाही प्रियच आहे...हे ही जरूर वाचा
    http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/06/blog-post.html

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...