Monday, February 21, 2011

गंध !.. उदबत्तिचा, औषधांचा आणि तान्हुल्या जीवाचाही...!!!

नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की, स्वारीने कालच हा सिनेमा पाहिलेला दिसतोय. 
तर गंध.. काय बरं फरक आहे वास आणि गंध यात? मला वाटते की वासाला आठवणी चिकटल्या की तो गंध होतो. 
ह्या पिक्चरचेच पाहा ना, तीन निरनिराळी  कथानके, पात्रांचे जगण्याचे मापदंडही वेगळे, तरीही या सर्वांना जोडणारा एक common धागा..अर्थात गंध !
पहिली गोष्ट एका उपवर लग्नेच्छु तरुणीची. घरचे 'लग्न कर' म्हणून मागे लागलेले , स्थळही सांगून येतायत आणि अशातच तिला भेटतो एक साधासा तरुण  ज्याच्या शरीरगंधावर ती मोहित होते. पुढे त्याचा पाठलाग करत असताना तिला कळते की तो रात्री एका उदबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात काम करत असतो. नंतर काय होते हे सुज्ञास  सांगणे न लगे... पण तरीही.. या कथेचा सुखांत होतो!!  खरेतर ही कथा फार वेगळी नाही. काही वेळा तर  अमृता सुभाषच्या थोड्याश्या नाटकी अभिनयाचा वैतागही येतो. तरीपण कथेची मांडणी, camera ने पकडलेल्या ओळखीच्या तरीही वेगळ्या अशा पुण्यातल्या गल्ल्या आणि गिरीश कुलकर्णीचा संयत अभिनय या गोष्टी आपल्याला नक्कीच खिळवून ठेवतात. 
          माझ्यामते तरी हा सिनेमा  उरलेल्या दोन कथांमध्ये जबरदस्त पकड घेतो. एक गोष्ट म्हणजे 'औषध घेणारा माणूस' आणि दुसरी ' बाजूला बसलेली बाई'. त्यापैकी 'औषध घेणारा माणूस' ही गोष्ट आहे एका 'HIV positive ' माणसाची ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे व काही काळाने त्याला परत भेटायला आली आहे. त्या दोघानमधिल अजूनही शिल्लक असलेल्या प्रेमाचे रंग सोनाली कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी अतिशय हळुवारपणे साकारले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही पण मिलिंद सोमण हा ही किती गुणी कलाकार आहे हे वेळोवेळी  जाणवते. खास उल्लेख करायला हवा तो त्याच्या शुद्ध मराठी उच्चारांचा.. [ हो कारण बरीचशी मराठी models , मराठी अगदी नवीन शिकत असल्यासारखे बोलतात.] 
                   हा 'HIV positive ' माणूस फक्त औषधांवर जगतोय, पण त्याची पत्नी त्याला ज्यावेळी सोडून गेली त्या क्षणापासून त्याने ते घर जसे च्या तसे ठेवले आहे.. तिची आठवण म्हणून! ती खूप दिवसांनी घरी येणार ह्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने मनात अगणित योजना तयार केल्या आहेत. खास तिच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला आहे. पण तिला मात्र आल्यापासून कसला तरी सडलेला दर्प येतो आहे घरात आणि मग हळूहळू त्या दोघांना (आणि आपल्यालाही) असे जाणवते की हा माणूस वास घ्यायची शक्तीच गमावून बसलाय. अगदी कांदा किंवा लिंबू अशासारखे तीव्र वासही त्याला जाणवत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून तो gas चे  बटण  लावतो व बर्नर च्या अगदी जवळ जाऊन तो वास घ्यायचा प्रयत्न करतो... कितीतरी वेळ... याचा शेवट दिग्दर्शकाने जसा काही तुमच्यावर सोडला आहे...अगदी कालवाकालव होते त्यावेळी... 
         तिसरी गोष्ट आहे तळकोकणातल्या अशा एका घराची ज्यामध्ये एक माहेरवाशीण बाळंत होत आहे आणि त्या घरातील कर्ती बाई 'बाजूला' बसली आहे. तिचा नवरा बाहेरगावी गेला आहे. या सगळ्या वातावरणाला पार्श्वभूमी आहे ती मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेची. एकीकडे या बाईची सासू मुलीचे बाळंतपण पार पाडताना मेटाकुटीला आली आहे तर दुसरीकडे या 'बाजूला' बसलेल्या बाईचीही तगमग होत आहे... दोन कारणांमुळे, एक म्हणजे घरातील घडामोडी व दुसरे म्हणजे तिची स्वतःची कूस अजून रिकामीच आहे.. या सर्व काळामध्ये तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा भाचा राघव! या दोघांमधील संवाद, त्याच्यामधील राघूचा निरागसपणा, नीना कुलकर्णीच्या डोळ्यामधील भाव [हो, सांगायचे राहिलेच, ही बाजूला बसलेली बाई  नीना कुलकर्णीने रंगवली आहे .]  यातील काहीही miss करून चालणार नाही. शेवटी चौथा दिवस उजाडल्यानंतर कसेबसे सर्व आवरून ही बाई जेव्हा त्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्या जावळाचा, त्याच्या अंगाचा श्वास भरून गंध घेते तेव्हाची तिची भावमुद्रा आपल्या मनात कायमचे घर करते. 
      ही गोष्ट घडत असताना दिग्दर्शकाने (किंवा कैमेरामन ने म्हणूया हवे तर) तळकोकणाचे असे काही भुलवणारे रूप दाखवले आहे की निव्वळ त्याच्यासाठी ह्या सिनेमाला १०० पैकी २०० मार्क्स द्यावेत. एडिटिंग ची सुद्धा हीच गोष्ट आहे... 
एकूण काय, सचिन कुंडलकर यानी त्यांच्या ठेवणीतून पेश केलेल्या या अत्तराच्या कुपीचा गंध आपल्या मनात दीर्घकाळ रुंजी घालतो हे नक्की...!!

          

Monday, February 14, 2011

Happy Valentines Day.. To all human beings!!


प्रेम..नुसत्या उच्चारानिशी अंगावर रोमांच फुलवणारा जादुई शब्द ! 
व्यक्ती बदलली की प्रेमाचे संदर्भही बदलतात. कोणासाठी मातृप्रेम  हे सर्वश्रेष्ठ तर कोणासाठी देशप्रेम . कोणाला सत्तेचे प्रेम आंधळे  बनवते तर कोणाला पैशाचे प्रेम... कोणी दर दिवसाला बदलणारी गर्लफ्रेंड हीच प्रेमाचीअभिव्यक्ती मानतो तर दुसरीकडे 'जिच्यावर मनापासून प्रेम केले अश्या प्रेमिकेचा दुर्दैवी अंत झाल्यावर तिच्या आठवणीवर  उरलेले आयुष्य काढणारा प्रेमिकही आपल्याला भेटतो. पण एक मात्र नक्की, आपण सगळे  'प्रेम' या संकल्पनेवरच  मनापासून प्रेम करत असतो.
त्यातून आज तर काय, जगभरातील 'प्रियकर-प्रेयसीला' त्यांच्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करायचे license  देणारा दिवस.. जिकडे पाहावे तिकडे कसे गुलाबी वातावरण तयार झाले आहे. सगळ्या सार्वजनिक बागा आणि जागा  तरुणाईने  भरून आणि बहरून गेल्या आहेत. ' I LOVE YOU'  किंवा 'मी तुझी साथ जन्मभर सोडणार नाही' अशा आणाभाका चोहिकडे ऐकू येत आहेत. (त्यातल्या किती निभावल्या जातात त्याचे संशोधन करायला वेळ कुणाला आहे इकडे? ).  बरयाच विवाहोत्सुक जोड्यांनी लग्नबंधनात अडकण्यासाठी आजचाच पवित्र(?) मुहूर्त निवडलाय. dinner ला कोठे जायचे, आपल्या प्रिय व्यक्तीला भेट काय द्यायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले आहे. एखाद्याच्या मनात जर गिफ्ट विषयी confusion असेलच चुकून, तर मोठमोठे shops आहेत की सज्ज तुमची ही छोटीशी समस्या दूर करायला.. हा खिसा तेवढा जड़ असला की झाले..  
वरील सर्व वाचून 'हिला प्रेमाची allergy आहे का ' असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू का, मला allergy ही प्रेमाविषयी नसून प्रेम साजरे करण्याच्या प्रकाराबद्दल आहे. इतक्या हळुवार, नाजूक भावनेचे जाहीर प्रदर्शन करण्याची खरोखरीच किती गरज आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत ही भावना पोचली की पुरेसे नाही का? आणि गिफ्ट चे म्हणाल तर तुमचे शाश्वत प्रेम हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे गिफ्ट नाही का? म्हणजे काहीच गिफ्ट देऊ नका असे नाही.. पण केवळ  त्याच्या  किमतीवरून तुमच्या प्रेमाची खोली नाही ना मोजली जाऊ शकत...तेव्हा गिफ्ट देताना त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार सर्वात आधी..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'partner' खेरीज इतरही माणसे आहेत हो आपल्या जीवाभावाचीज्यांनी स्वतःच्या असंख्य इच्छा-आकांक्षा बाजूला सारून तुम्हाला परिस्थितीची जाणीव न करू देता वाढवले ते आई-बाबा,ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःला मिळालेल्या chocolate चा अर्धा तुकडा राखून ठेवला ती तुमची भावंडे, ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात साथ दिली ते तुमचे शेजारी, तुम्हाला शिकवलेले शिक्षक.. फार गरज आहे हो यासगळ्यांना तुमच्या प्रेमाची.... तुम्ही ते करत नसाल असे नाही, पण त्याची कबुली त्या व्यक्तीकडे देऊन तर बघा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खूप काही देऊन जातील तुम्हाला.. आपले आयुष्य ज्यांनी ज्यांनी सुंदर केले त्यांनाआपण बाकी काही देऊ शकत नसलो तरी त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, कृतदन्यता व्यक्त करण्यासाठी या दिवसासारखा दुसरा दिवस नाही असे मला तरी वाटते. 
तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून 'Happy Valentines Day....!!!'

Monday, January 31, 2011

दिल तो बच्चा है जी..

आजचीच गोष्ट. छान आरामात घालवलेल्या शनिवार-रविवार या जोडगोळीनंतर  आलेला उदासवाणा सोमवार. बरयाच वेळा मला तरी सोमवारी ऑफिसला बुट्टीच मारावी असा विचार मनात येउन जातो. पण काय करणार? मज़बूरी, दुसरे काय ! त्यातून आज महिना अखेर. अस्मादिकांच्या बचत खात्यात थोडेसे जास्तीचे पैसे जमा असतील (पगाराचे हो, दुसरे कुठले?) असा विचार करून स्वारी सर्व काही वेळेवर आवरून, पिल्लाला डे-केयर मध्ये सोडून खुशीत मोबाइल वर गाणी ऐकत ऑफिसला जायला निघाली. मी सहसा बसने प्रवास करते. पैशाची बचत, चार अनुभव गाठीशी बांधता येतात वगैरे वगैरे... (पुण्यातले ट्राफिक पाहता खरा विचार हा असतो की  ड्राईवरने बस कशीही चालवली तरी काही विपरीत झाल्यास बसचे [व पर्यायाने आपले] सर्वात कमी नुकसान होईल.) पण आज शेयर-मारुती येताना दिसली, म्हटले चला जाउन बघूया. त्या मारुती वाल्याचा चेहरा अगदी श्रीरामांच्या जवळपासचा दिसत होता  म्हटल्यावर माझी हिम्मत आणखिन वाढली. 
   आत बसले मात्र, त्याने आपले खरे स्वरुप सर्व प्रवाशाना दाखवायला सुरुवात केली. गाडी नावाप्रमाणेच मारुती असावी की काय अशा वेगाने तो ती चालवत (की उडवत) होता. ह्या स्वर्गलोकिच्या वाहनासमोर 'speed-breaker' किंवा रस्त्यावरील इतर वाहने अशा क्षुद्र गोष्टींची काय पत्रास हो? त्यात भरिस भर म्हणून ती 'share-vehicle special' ढिंचाक गाणी! मी तत्परतेने माझ्या सेल वरची गाणी बंद करून टाकली. उगाच आपल्या  सेलची battery कशाला डाउन करा? (असे सुविचार पुण्यात शिफ्ट झाल्यापासून सुचतायत बर का !!). आणि सह्प्रवाश्यांच्या चेहेरयावरिल भीती, चिंता, कुतूहल, राग अशा भावनांचे मिश्रण वाचत बसले होते.  
अचानक गाडीत चाललेला तो वाद्यांचा कलकलाट बंद झाला आणि राहत फतेह अली खान चे हळुवार स्वर कानावर येऊ लागले....'दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी...' त्या एकंदर माहौलाशी ते वरवर इतके विसंगत वाटत होते तरीही त्या सुरात अशी काही जादू होती की मन खरच एखाद्या लहान मुलासारखे टुणकन उडी मारून गाडीच्या बाहेर पळाले. पतिराजांबरोबर छानसा पिक्चर बघून व मस्त dinner घेउन आले. बछडयाबरोबर धमाल दंगामस्ती करून आले. माझ्या आवडीचे छानसे पुस्तक वाचून आले. तसेच माहेरी जाउन आईच्या उबदार कुशीत शिरून आले. आजीशी पत्ते खेळून आले. कितीतरी गतकाळातले क्षण पुन्हा नव्याने जगून आले. अनेक नात्यांच्या रेशीमगाठी नव्याने विणून आले..
' madam, उतरा की आता. दहा रुपयात आणखी किती पुढे जाणार?? ' .. गाडिवाल्याच्या प्रेमळ दटावणीने माझी तंद्री भंगली. त्याला दहा रुपये देताना मी मनात म्हटले 
' मित्रा, इथे पुढे कोणाला जायचे आहे? दहा रुपयात तू मला कितीतरी मागे नेऊन आणलेस तेच
 आजचा दिवस तरी पुरेल..!!'

Monday, January 24, 2011

असा गन्धर्व पुन्हा न होणे..!!

भीमसेन जोशींचे निधन.. ऑफिस मध्ये आल्या आल्या 'सकाळ' वर ही बातमी वाचली.
खूप धक्का बसला वगैरे म्हणता येणार नाही. कारण गेले काही दिवस त्यांच्या तब्येती विषयी काहीबाही ऐकायला येतच होते. आणि एकंदरीत  त्यांचे वय पाहता  मनाला पुढील अशुभाची चाहुल लागली होती. पण म्हणतात ना, आनंदाच्या झाडाची कितीही फुले तोड़ता आली तरी 'आणखिन हवे' चा पुकारा मन काही थाम्बवत नाही. तसेच पंडित भीमसेन जोशींचे गाणे.. कितीही ऐका, दरवेळी नवा सुगंध येतो त्यातून. जिवंतपणी समाधिचा अनुभव घ्यायचा असेल तर पंडितजींच्या गाण्यासारखे दुसरे साधन नाही.. या गारुडातून कोणाचीही सुटका झाली नाही. मग तो अगदी एखादा सुपरस्टार असो किंवा एखादा 'माउलीच्या भेटीला' निघालेला वारकरी .. त्यांच्या अलौकिक स्वरानी जेथे साक्षात् पंढरीच्या विठोबाला भारुन टाकले तिथे तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानवांची काय कथा हो? 
       माझी खात्री आहे, आता आकाशातले तमाम देवदेवता आनंदात असतील... इतकी वर्षे या गंधर्वाला भूलोकिवर पाठवल्यामुळे रिकामा झालेला त्यांचा दरबार आता भरला असेल. पण ही पृथ्वीवरची मैफल संपली त्याचे काय? 
      असा निराश विचार मनात आला, पण तितक्यातच असे वाटले की अरे, पंडितजींनी आपल्या सर्वाना सुरांचा जो अमूल्य ठेवा दिला आहे तो एक नाही तर सात जन्म पुरणारा आहे मग काळजी कशाला? 


   

  

Monday, January 17, 2011

श्रावणात घन निळा बरसला....

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की या गुलाबी  थंडीत हिला श्रावण कुठे आठवतोय? पण त्याला निमित्तही तसेच झाले.
             तर झाले असे की माझ्या प्रेमळ, उदार, बहुगुणी (वगैरे वगैरे..) नवरयाने आमच्या नविन घराला शोभेल असे SONY चे चकाचक 'HOME THEATRE' खरेदी केले आहे. तसा माझा नवरा (आणि आता माझा दिड वर्षाचा बछड़ा देखिल ) संगीताचा दर्दी ! अर्थात माझीही आवड साधारण त्याच्यासारखीच  आहे म्हणा. तर काल खूप दिवसानी थोडा निवांतपणा होता म्हणून छान गाणी ऐकत बसलो होतो. CD play होत होती. आणि मध्येच कधीतरी हे गाणे सुरु झाले... ऐकता ऐकता डोळ्यासमोर साक्षात श्रावण उभा राहात होता. मन एकदम माहेरीच पळाले आणि ओटीवरील झोपाळ्यावर झोके घेऊ लागले..
     
       माझ्या माहेरी सर्व सणवार अगदी यथासांग पार पाडले जातात आणि त्यातही श्रावणाची मजा काही खासच. सुरुवात होते ती दीवली आमवास्येपासून. [त्याला 'गटारी अमावस्या' असे म्हटलेले मला तरी नाही आवडत बाबा]. ते तबकातले पुरणाचे खरपूस दिवे ज्यानी खाल्ले आहेत त्याना मी का असे म्हणते ते कळेल.
     मग आमचे आवडते काम म्हणजे 'जिवतिचा कागद' देवघरातील भिंतीवर लावणे! त्यातले 'नर्सोबाचे (नरसिन्हाचे) चित्र हे इतके जिवंत रेखाटले गेले आहे की मला अजूनही त्याची भीती वाटते. मग येणारे श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार, श्रावणी सोमवार , श्रावणी मंगळवार वगैरे नेहेमीचेच -पण नावामागे 'श्रावण' लावल्यामुळे एकदम special झालेले- यशस्वी कलाकार. आणि त्याबरोबरच आईची ब्राह्मण -सवाष्ण जेऊ घालण्यासाठी चाललेली तयारी. आम्ही खुश, कारण पुरणपोळी, उकडीचे मोदक, भरड्याचे वडे, नारळीभात, ओल्या नारळाच्या करंज्या, खांडवी अश्या पक्वानांची घरी अगदी रेलचेल असायची. त्याचबरोबर ,विशेष करून शनिवारच्या दिवसभराच्या उपवासानंतर गरमागरम कोळ-खिचड़ी, त्यावर साजुक तुपाची धार व बरोबर लाल माठाची भाजी ही खरोखर आत्मा व रसना दोन्ही एकदमच संतुष्ट करून जायची. तिन्हीसांजा झालेल्या, बाहेर रिमझिम पाउस पडतोय, देवांपाशी मंद नंदादीप तेवतोय, उदबत्तिच्या गंधाने पूर्ण घर भरून आणि भारुन गेले आहे ,अशा  वातावरणातली ती गरमागरम खिचड़ी नुसती आठवली तरी जीव नुसता गलबलून जातो.. 
  
आमचे ग्रामदैवत रामेश्वर! श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार पासून ते दुसरया सोमवार पर्यंतचे सात दिवस देवळात 'सप्ता ' असतो. सतत वेगवेगळी भजनी मंडळे देवासमोर छान छान भजने सादर करतात. तो झांजांचा मंजुळ आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो कधीकधी.. तो दारात अवचित उगवलेला तेरडा, टाकळा, रुईची पाने, त्या मंगलागौरीसाठीच्या तर्हेतर्हेच्या वनस्पती, तो केवड़ा, तो मध्यरात्रि साजरा होणारा कृष्णजन्म, ती दही-पोहे व लोणी-साखरेची वाटी, नागाला वाहिलेले नागाणे-फुटाणे... सगळ्या आठवणींचे छानसे इंद्रधनुष्य होउन मनाभोवती फेर धरायला लागते आणि 'श्रावणात घन निळा बरसला....' हे गाणे त्याच्या अर्थासाहित उलगडायला लागते..!!
खरच, श्रावण हा मराठी महिन्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे ते उगीच नाही काही ..
अशीच मला आवडलेली श्रावणाची एक net वरून मिळालेली कविता व छबी खाली जोडत आहे.. 





Friday, January 14, 2011

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!








चला ,ह्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घराप्रमाणेच आपली मनेही साफ़ करुया.  
एकमेकाना माफ़ करुया. ! प्रतिद्या करुया की आपण सारे - 
 नव्या ओळखी करून घेऊ . जुने सम्बन्ध वृद्धिंगत करु. नातेवाइकान्बरोबरच आपण ज्यांच्यावर खरया अर्थाने अवलंबून असतो तया मोलकरीण, ड्राइवर अशा लोकानाही स्नेहाचे वाण देऊ. त्यांच्या कष्टाचा सन्मान करू. आजारी लोकांची प्रेमाने (किमान फोनवरून तरी ) विचारपूस करू. आपल्या लहानग्याना जवळ बसवून मायेने त्यांचे लाड करू. त्याना ढीगभर खेळण्यांबरोबरच आपला थोडासा वेळही देऊ.  सर्वानी मिळून तोंड गोड करू. आणि आपले आयुष्य, जगणे सुन्दर करू...
          तुम्हा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
       
 तीळगूळ घ्या गोड गोड बोला..





Monday, January 10, 2011

My Name is Khan.. च्या निमित्ताने ..!!

कालच NDTV Imagine ला हा पिक्चर लागला होता. बाकि काही विशेष करण्यासारखे नव्हते म्हणून म्हटल चला बघून टाकू. 
पिक्चर पाहिला आणि का कोण जाणे, खूप अस्वस्थता दाटून आली मनात. तसे पाह्यला गेले तर typical  'करण जोहर'  छाप असलेला आणि ९/११ च्या हल्ल्याची पार्श्वभूमी वापरून, प्रेक्षकाना अमेरिका दर्शन घडवलेला एक सामान्य चित्रपट असेही त्याचे वर्णन होऊ शकेल. याहून सर्वदृष्टिनी कितीतरी सरस चित्रपट मी यापूर्वी कितिदातरी पाहिले आहेत, तरीपण मग ही अस्वस्थता कसली? 
विचार करत गेले तसे तसे जाणवत गेले की ही बेचैनी होती माझ्या छोट्या पिल्लासाठीची जो यावर्षी pre-school मध्ये जाईल.  मग त्याचे मित्र, त्यांचे आपल्यादृष्टिने  अतिशय क्षुल्लक पण त्यांच्याकरिता खूप महत्वाचे असे इगो problems, त्यातून उद्भवणारे मतभेद आणि शेवटी त्याचे मारामारीत होणारे पर्यवसन, हे सगळे चित्र  डोळ्यासमोर तरळले व जीव अगदी घाबराघुबरा झाला. मनात आले, आईवडील रात्र-रात्र जागून ज्या चिमण्या जीवाचे रक्षण करतात,त्याच्याभोवतीच आपल्या आयुष्याचे तलम वस्त्र
 विणतात, त्या तान्हुल्या जीवाची किम्मत कोणाच्यातरी ego पेक्षाही कमी? हा ego निर्माण तरी
 कसा होतो आणि तो जोपसतो तरी कोण? आणि हे मारामारी करणारेही कोणाचा तरी मुलगा/मुलगी असतातच ना? म्हणजे पर्यायाने समाजाचा एक घटक म्हणून आपणही अशा घटना घडण्यास  अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही काय? 
      विचार खोल खोल जात होते. मनाचा तळ ढवळून काढत होते. वाटले की 'आपण एका ठराविक जाती/धर्मात जन्माला आलो यात आपला दोष किंवा कर्तृत्व ते काय?.' खर तर जात ही जन्माने नाही तर कर्माने ठरायला हवी. आणि ह्या संदर्भात ह्या पिक्चर मध्ये झरीना वहाब च्या तोंडी एक मार्मिक वाक्य आहे. ती मुलाला म्हणते की माणसांच्या फक्त दोनच जाती- एक चांगली माणसे आणि दुसरी वाईट. माझ्या पाहण्यात असे एक भटजी आहेत की जे दररोज पौरोहित्य करतात पण त्यानी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्याचवेळी माझा एक मुस्लिम मित्र मात्र स्वताला मुलबाळ नसतानाही , 'सबका मालिक एक ' म्हणत दुसरयाना मदत करायला एका पायावर तयार.. आता तुम्हीच सांगा, कोणाचा धर्मं कोणता? 


या नविन वर्षात बाकी काही संकल्प नाही केले तरी ' माणसाला प्रथम फक्त माणूस म्हणून पाहायचा ' संकल्प सोडायला आणि तो तडीस नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आहात का माझ्या बरोबर??

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...