Friday, April 8, 2011

कुंकू .. (सन १९३७)

वाचकहो, 
लेखाचे शीर्षक वाचून तुमच्या चेहरयावर उमटलेले प्रश्नचिन्ह मला स्पष्टपणे दिसते आहे. ' Out of Africa ' नंतर लगेच कुंकू? आणि ते सुद्धा आपल्या आजोबांच्या काळातील? पण माझी खात्री आहे, जर तुमच्यापैकी कोणी हा सिनेमा पहिला असेल तर तुम्हाला या दोघांमधील समान धागा लगेचच उलगडेल. या दोघांचेही एक ठळक वैशिष्टय असे कि हे दोन्ही चित्रपट खरया अर्थाने स्त्री-केंद्रित आहेत. मग भले समस्या निराळ्या का असेनात..!!
      एका वाक्यात सांगायचे तर हा सिनेमा म्हणजे एक नामवंत वकील 'काकासाहेब' आणि त्यांची (मुलगी शोभेल अशी) पत्नी 'नीरा' यांच्यातील खिळवून ठेवणारा संघर्ष आहे. 

नीरेवरील मातापित्यांचे छत्र केंव्हाच हरपले आहे. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण दिले आहे. सुसंस्कृत केले आहे, तसेच स्वतंत्रपणे विचार करायलाही शिकवले आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न नीरा, आपल्या मामा-मामीच्या घरात राहत आहे. त्या घरातील परिस्थिती तिच्या घराच्या अगदी विरुद्ध आहे. मामा मामी घरच्या गरिबीला आणि खंडीभर मुलांना कंटाळलेले आहेत. परिस्थितीवश मामा नीरेचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बरयाच मोठया अशा एका नामवंत वकिलाशी लावून देतो. हे लग्न नीरेला फसवून करण्यात आले आहे. म्हणजे बैठकीला एका तरुण मुलाला बसवून प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी मात्र या बिजवराला उभे करण्यात आले आहे. नीरेला जेंव्हा सत्य परिस्थिती उमगते तेंव्हा सर्वप्रथम ती हे लग्नच नाकारते. पण घरातील कोणीही तिचे काहीएक न ऐकता तिला नवरयाबरोबर त्याच्या गावी रवाना करतात. नीरा त्या गावाला जाते खरी, पण तिथे त्या घरातच ती स्वताचे वेगळे विश्व निर्माण करते. वृद्ध पतीचा मान राखतानाच त्याला शरण जायचे नाकारते. नवर्याच्या कारस्थानी आत्याविरुद्ध बंड पुकारतानाच, तिच्या नातीबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करते. घरातील अडगळीच्या खोलीचे स्वरूप पालटते. त्या खोलीला देवघरचे रूप आणते. काकासाहेबांच्या उद्धट आणि रंगेल मुलाला वठणीवर आणतानाच त्यांच्या बुद्धिमान मुलीचा आदर्श मात्र सतत डोळ्यासमोर ठेवते. शेवटी काय होते ते पडद्यावरच पाहणे योग्य..
चित्रपट, मग तो कोणत्याही काळातील असे ना का, त्याची कथा हाच त्याचा खरा आत्मा असतो, हे हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला नव्याने जाणवते. तसे पाहिले तर हा चित्रपट 'कृष्णधवल' काळातील आहे. तरीपण दमदार कथेच्या आणि सच्या सादरीकरणाच्या शोधात असलेल्या कुणाही रसिकाला रंगांची कमतरता मुळीच जाणवू नये अशीच या चित्रपटाची मांडणी आहे. 
शांता आपटे (नीरा) आणि केशवराव दाते (काकासाहेब) या नामवंत कलाकार मंडळीनी आपापल्या भूमिकांमध्ये आपला जीव ओतला आहे.  त्यातील आशयघन गाणी, प्रभात ची दर्जेदार निर्मितीमूल्ये.. सारेच विचार करायला लावणारे.. आपणा सर्वांसाठी हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देवून जातो - 

' मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वीमोलाची !
तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची, परवा ही कुणाची ?' 


No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...