Sunday, November 18, 2012

भगव्याच निखाऱ्यावरती त्याची एकांत समाधी ...

आजची सकाळ. नेहेमीच्याच रविवार सकाळ प्रमाणे. तरीही खूप खूप वेगळी..
मी पेपर चाळत बसलेली -
ढाण्या वाघ हरपला..
युगांत..
The Tiger's Last Sigh..
कितीतरी पेपर्स, बातमी मात्र एकच. जसे कितीतरी नेते, पण बाळासाहेब एकमेव...
मथळे वाचून झाल्यावर पुढचा मजकूर वाचताच येत नाहीये. डोळे भरून आलेत. एरव्हीचा बुद्धिवाद बाजूला ठेवून अश्रू ओघळत आहेत.. खूप आश्चर्य वाटत आहे. स्वतःविषयीच..
आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन न करणारे. मतदानाबाबत उदासीन. दंगल, बंद, मोर्चे या सगळ्याशिवायही प्रश्न सोडवता येऊ शकतील कदाचित, अशा मताचे. थोडेसे 'स्वतःपुरताच' मर्यादित विचार करणारे. आयुष्यात राजकारणापेक्षा कितीतरी महत्वाच्या आणि constructive गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण स्वतःला झोकून देवू शकतो असे मानणारे... तरीही !
आठवली ती कालची संध्याकाळ. शनिवारची हक्काची दुपारची झोप झाल्यावर टीव्ही लावला. 'ती' बातमी पाहिली. पहिली प्रतिक्रिया- शेवटी आली बातमी ! दुसरी प्रतिक्रिया - इतर नेतेमंडळी काय बोलत आहेत ते तरी पाहू या. तिसरी प्रतिक्रिया - अरे, या channel वर बाळासाहेबांचीच मुलाखत दाखवत आहेत, ती ऐकायला हवी....
शेवटी रात्री दीड वाजता नाईलाजाने टीव्ही समोरून उठलो तेंव्हा एक विचार मनात येत होता - शेवटच्या कधी बरं इतक्या तन्मयतेने आपण टीव्हीवरील बातम्या पहिल्या होत्या? - हं, बरोबर, २६ नोव्हेंबर २००८. ताजवरील हल्ल्याच्या वेळी. त्यानंतर एकदम आज...
कुमार केतकर आणि निखील वागळे बाळासाहेबांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व उलगडत होते. संयुक्त महाराष्ट्र, शिवसेनेची स्थापना, दसरा मेळावे, आणीबाणी, बाळासाहेबांच्या अनेक प्रसंगातील भूमिका, उद्धव, राज....कितीतरी गोष्टी.. त्यातील राजकारण अनेक लोकांकडून ऐकलेले. पण राहून राहून एक प्रश्न पडत होता- ज्या दोन व्यक्ती कधीतरी साहेबांच्या टीकेच्या धनी होत्या, त्याच साहेबांविषयी इतके भरभरून, पोटतिडीकीने कसे बोलत आहेत? नंतर जाणवले की अश्या एक दोन नव्हे तर हजारो व्यक्ती आहेत. इतका कुठला magnetism असेल बरं यांच्याकडे? राजकीय विचारधारा व कृती काहीही असो, सगळ्यांचे या मुद्द्यावर एकमत होत होते - बाळासाहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही....त्यांची व्यंगचित्रकारिता, उत्स्फूर्तता, कलाकारांविषयी असणारे प्रेम, त्यांच्या एखादया भूमिकेमागे असणारा विचार, त्यांचा परखडपणा, आक्रमकता, वैयक्तिक आयुष्यात जपलेली असंख्य नाती, बागकामाचा छंद .... सारेच 'प्रचंड' आणि अनाकलनीय...  सगळेच या अजब रसायनाबद्दल पुनःपुन्हा विचार करण्यास भाग पाडणारे !! अंथरुणावर पडलो खरे, पण झोप अशी येईच ना.
उगवली ती आजची सकाळ - उठल्यावर लगेचच हात टीव्हीच्या बटणाकडे.. आजचा दिवस आमच्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या नावे केला असेल...नऊच्या सुमारास मातोश्रीहून त्यांची महायात्रा निघाली. 'न भूतो न भविष्यति' असा जनसागर लोटलेला.. अश्रूंचे कढ, घोषणांचा गजर...'अमर रहे' ही घोषणा नेहेमीचीच पण ' कोण आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' , किंवा ' परत या परत या, बाळासाहेब परत या' अशा घोषणा ऐकल्यावर पुन्हा मनात प्रश्नचिन्ह - अशी काय बरे जादूची कांडी होती या माणसाकडे? आपल्यासारख्या सामान्य माणसाना जिथे घरातील मोजक्या सदस्यांचीही मर्जी सांभाळणे कठीण जाते, तिथे माणसांचा व त्यांच्या भावनांचा महामेरू  कसा हाताळला असेल बाळासाहेबांनी?
मुंगीच्या पावलांनी अंत्ययात्रा पुढे सरकत होती. रिपोर्टर सांगत होता - इतक्या प्रमाणावर गर्दी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी लोटली होती. त्यानंतर आज....
संध्याकाळचे सहा-सव्वासहा वाजलेले. आज पहिल्यांदा दोन सूर्य एकाच वेळी अस्ताला चाललेले... घालमेल, उदासी, अनेक प्रश्नचिन्ह, भावनांचा गोंधळ... !! दिवसभर 'बाळासाहेब' या व्यक्तीच्या अनेक पैलूंवर चर्चा केलेली, वादविवाद झडलेले... आता मात्र उरली आहे ती निव्वळ शांतता !! कविवर्य अशोक बागवेंच्या शब्दात -
ज्वाळात जळून गेलेला तो सूर्यच होता आधी
भगव्याच निखाऱ्यावरती त्याची एकांत समाधी ...

बाळासाहेब... तुम्हाला मनापासून आदरांजली......!!!!




















1 comment:

  1. दिव्यत्त्वाची जेथे येते प्रतीची , तेथे कर जोडती

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...