Friday, August 5, 2016

Worries, Weight-Issues, Waste-in-brain??... Just Walk Them Off !!! :)

  नमस्कार,

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केलाय. अनेक दुर्घटना घडतायत आणि मन खंतावतंय. आपण काही करू शकत नाही आणि तरीही वाईट वाटतंच... असो.

गेले दोन तीन दिवस पावसामुळे बाहेरच पडावेसे वाटत नव्हते. त्यात सिझनल आजारपणामुळे घ्याव्या लागलेल्या अँटीबायोटिक्सनी पोटात धुडगूस घातलाय. खावेसे वाटतेय पण ऍसिडिटी होतेय, झोप येतेय, काम होत नाहीये, ऑफिसला जाता येत नाहीये आणि व्यायाम तर मागच्या जन्मीच केला होता बहुतेक... चिडचिड होतेय.

शेवटी आज, घरातल्या दोन मुलांना शाळा आणि कामावर धाडून , मनाचा हिय्या करून बाहेर पडले. जोरदार पाऊस, वारा, आजारपण या कशाचीही पर्वा नं करता. ठरवलेच होते, जमेल तेवढे चालायचे. एक पाऊल आणि मग दुसरे ... स्वतःतून बाहेर पडून, डोळे उघडे ठेऊन फक्त माणसे अनुभवायची ....

ती पहा, एक कन्या, बाईकवर स्वार होऊन एका फळ-विक्रेत्यांशी सुमारे पावणेदोन रुपयांसाठी पाच मिनिटे हुज्जत घालत आहे. पै पै वाचवून संसार करणाऱ्या त्या मातामाऊलीला माझा साष्टांग दंडवत !!

थोडे पुढे गेल्यावर ते पहा एक आजोबा.. गेल्या सव्वापस्तीस वर्षांचा सकाळी चालण्याचा दिनक्रम चुकू नये म्हणून आजही बाहेर पडले आहेत. एका हातात मेथीसदृश्य भाजीची पिशवी, छत्री आणि दुसऱ्या हातात?  अगदी बरोबर - पुण्याचा जगप्रसिद्ध "सकाळ" पेपर. :) तमाम पुणेकरांना चहाबरोबर सकाळ लागतोच. सर्व गोष्टींचा तोल सांभाळताना आजोबांच्या हातातून सकाळ निसटतो. कोणीतरी पटकन पुढे होऊन त्यांना तो उचलून देते पण तोपर्यंत पेपरमधील सर्व बातम्या "पाण्यात " गेलेल्या असतात. आता आजोबाना बहुदा इस्री मारून पेपर वाचावा लागणार !

अरेच्या, हा रेनकोट काय बरं करतोय रस्त्यावर?? अच्छा, आतमध्ये एक दप्तर पण आहे वाटतं ! आणि त्या दप्तराच्या ओझ्याआड एक १२-१५ किलोचा गुंडगोळा पण. चेहेऱ्यावर शुद्ध नाईलाज घेऊन ते पोरं शाळेत नेणाऱ्या बसची वाट बघत उभं आहे. "दप्तर फेकून द्यावे, रेनकोट काढून टाकावा, आणि पावसात मनसोक्त (आईने एक धपाटा देईपर्यंत तरी ) हुंदडावे " या त्याच्या मनातील भावना त्याच्या चेहेऱ्यावर अगदी स्पष्ट वाचता येत आहेत. बच्चमजी, आज तरी  तुम्ही जात्यात आणि (मला ऑफिसला जायचे नसल्यामुळे) मी सुपात बरं का !! त्याला टुकटुक करण्याची उर्मी मनात दाबून ठेवत मी गार वारा आणि श्रावणसरी पुन्हा अनुभवायला लागते.

सुमारे एक तास आणि पाच किलोमीटर अंतर पार करून मी घरी येते तेंव्हा आरशातली मी कोणीतरी वेगळीच असते. अनेक चिंता, कटकटी, त्रागा, कशा कशाचा लवलेशही नसतो. तुम्ही अनुभवलंय असे काही ???












5 comments:

  1. ओघवत्या भाषाशैलीतील खुपच छान लेख वृषाली ताई. प्रसंग डोळ्यासमोर ऊभा करणारी लेखनशैली !

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा :) !!

      Delete
  2. मस्तच बढिया स्टाइल. nice one . mast style.
    thx

    ReplyDelete
  3. Thanks doctor for taking time and the appreciation. :)

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...