Thursday, September 27, 2012

एक संवाद: गणपतीबरोबर !!

दरवर्षीप्रमाणे तुझे गणेशचतुर्थीला वाजतगाजत आगमन झाले. आमचा प्रचंड उत्साह ढोलताशांच्या रुपात प्रकट होतच होता. तुझे सुपाएवढे कान कितीही मोठा आवाज सहन करू शकतात - नव्हे, मोठा आवाज नसेल तर तो तुझ्यापर्यंत पोचणारच नाही - असे वाटल्यामुळे तर आम्हाला अधिकच चेव चढला होता. आजारी, वयोवृद्ध माणसे, तान्ही बाळे यांना त्याचा थोडा त्रास झाला असेल म्हणा, पण आमच्या तुझ्यावरील अगाध श्रद्धेपुढे या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत. समाजात असेही घटक आम्हाला सामावून घ्यावे लागतात त्याबद्दल आम्हाला माफ कर.
तुझ्या स्वागताची किती जय्यत तयारी करतो आम्ही ! मंडप, वाजंत्री, लाउडस्पीकर, देखावे.. एक न दोन हजार प्रकार. आता या सगळ्यासाठी कमी का पैसा लागतो? म्हणून आम्ही वर्गणी मागायला गेलो, तर काही समाजकंटक आम्हालाच उलटा उपदेश करायला गेले. आता, त्यांना कसे हाताळायचे हे माहित आहे आम्हाला, पण तरीही, लोक देवाच्या दारीही  पैसे देताना इतकी कटकट का बरे करतात? त्यांना माफ कर देवा !!
तुला माहित आहे? आमच्यातले काही वेडे असेही आहेत कि गणपती येणार, म्हटल्यावर त्यांना कसलेच भान राहत नाही. रात्रंदिवस जागून सजावट काय करतात, देखावे काय उभारतात- थोडक्यात निरपेक्ष सेवेचा आव आणतात !! आता तू सांग, लोक तुला बघायला येणार कि बाकीच्या गोष्टी? आणि सर्वात महत्वाचे काम तर दहा दिवस जागरण करण्याचे आहे, जे आम्ही करतो. मग तूच सांग, कोण तुझे खरे भक्त? आता, रात्रभर जागायचे म्हणजे थोडा विरंगुळा पाहिजेच नाही का? आणि शहरात तर जागाच इतकी कमी आहे कि मग नाईलाजाने आम्हाला पत्ते तुझ्यासामोरच खेळावे लागतात. पण आमचे जे कार्यकर्ते तुझ्यासमोर साधे जागरणही करू शकत नाहीत त्यांना माफी असावी देवा !!
या दिवसांमध्ये आम्ही इतर कामांबरोबरच सामाजिक एकोपा जपण्याचाही खूप प्रयत्न करतो. आमच्या मंडपातील लाउड स्पीकर्सवर "मुन्नी  बदनाम हुई", "शीला की जवानी", " "छम्मकछल्लो ", आणि "वाजले कि बारा" गुण्यागोविंदाने  नांदत असतात. काहीना ते ही  बघवत आणि ऐकवत नाही. अर्थात  काळजी नसावी देवा ! आम्ही तुला वचन देतो, की अशा लोकांना आम्ही कधीच भाव दिला नाही आणि यापुढेही देणार नाही.
तुझ्या भक्तांच्याही किती रे तऱ्हा !! काही सच्चे भक्त तुला मनापासून सोन्याने मढवून टाकतात. काही नुसता तोंडदेखला नमस्कार करतात तर काही तो ही करत नाहीत. तुला सांगतो देवा, सोन्याचांदीमुळेच तर तुझे रूप खुलते. अशावेळी तुझ्यासमोरील दानपेटीत एक बंदा रुपयाही न टाकता, वर तू त्यांना प्रसन्न झाले पाहिजेस, अशी निरर्थक अपेक्षा ठेवणाऱ्या खुळ्या भक्तांची अगदी कीव येते बघ आम्हाला !! एका हाताने द्यावे व दुसऱ्या  हाताने घ्यावे, हा साधा व्यवहार कळत नाही त्यांना? खरच कमाल आहे !!
सर्वात मजा येते ती तुझ्या विसर्जनानंतर !! आधीच काही नास्तिक कंठशोष करत असतात- तुझी उंची किती असावी यावरून !! आता तू मला सांग, देव खुजा दिसून चालेल काय? आणि तू किती उंच आहेस त्यावरच आमची भक्ती मोजली जाते न? मग? हा, आता मूर्ती खूप उंच म्हटल्यावर विसर्जनानंतर होणारी तिची विटंबना ओघाने आलीच. पण एकदा तुझ्यातले देवपण विसर्जित केले, कि मग तू काय, आणि साधी माती काय ! काय फरक आहे? ते पर्यावरणवादी उगाचच काहीतरी पराचा कावळा करतात झाले...!!
पण गणराया, तू घाबरू नकोस. केविलवाणा तर मुळीच होऊ नकोस. आम्ही आश्वासन देतो तुला, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या भक्तीचा बाजार असाच भरवत राहू...!! तुला सोन्याचांदीने असाच मढवत राहू..!! समाजातील माणुसकीचा बळी देवून तुझा गाभारा नेहेमीच भरत  राहू... !! Promise !!!





1 comment:

  1. तो दान पेटीत टाकलेला रुपया हा कर परतावा असतो... म्हणजे टाकणारा हात सहीसलामत सुटून परत घरी येतो ना त्या श्रद्धेने... नाही टाकली तरी चालेल, काय कोणीही सहसा हाताने चालत नाही... पायानेच चालतात...

    "बळी" ह्या विषयावर लग्नात जो कान पिळी तोच हे उत्तर उत्तम...

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...